वन्यप्राण्यांच्या अपघातातील वाहने बेपत्ताच
By Admin | Updated: August 27, 2015 00:57 IST2015-08-27T00:57:19+5:302015-08-27T00:57:19+5:30
भंडारा जिल्ह्याला वनवैभव लाभले असून वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

वन्यप्राण्यांच्या अपघातातील वाहने बेपत्ताच
ना वनविभाग ना पोलिसांचे लक्ष : अपघात की शिकार कळेना
संजय साठवणे साकोली
भंडारा जिल्ह्याला वनवैभव लाभले असून वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यांची केलेली दुरुस्ती व वाहनांचा वाढता वेग यामुळे अनेक वन्यप्राणी रस्ता ओलांडीत असताना अज्ञात वाहनांच्या धडकेत दरवर्षी शेकडो वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभाग व पोलीस ठाण्यात आहे. मात्र तपासाअंती आजपर्यंत एकाही वन्यप्राण्यांच्या अपघातातील वाहन सापडल्याची नोंद नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांचे हे अपघात आहेत की शिकारी करताना सैरावैरा पडताना ठार झाल्याच्या घटना आहेत. याची चौकशी करण्याची गरज आहे.
भंडारा जिल्ह्याच्या मध्य प्रदेश छत्तीसगडच्या सीमा लागलेल्या असून संपूर्ण जिल्हाच वनांनी आच्छादलेला आहे.
तसेच नागझिरा व नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचा बराच मोठा भागही भंडारा जिल्ह्याला लागलेला आहे. त्यामुळे येथे वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वन्यप्राणी जंगलात इकडून तिकडे भ्रमण करतात. मात्र हे करताना अनेक वन्यप्राणी वाहनाच्या धडकेने ठार होतात.
घटनेनंतर वनविभाग घटनास्थळाची पाहणी करून मोका चौकशी करतात व प्रकरण बंद करतात. मात्र त्या वाहनंचा कधी शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. त्यामुळे हे अपघात आहेत की शिकार असा संशय बळावत आहे. या अपघातात बिबट, हरिण, सांबर, अस्वल, रानडुक्कर यासारख्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी वनविभागात आहेत.
२०१४ ला उकारा फाट्याजवळ एक बिबट, एक हरिण, एक अस्वल, २०१३ ला मुंडीपार जंगलात एक सांभर, एक रानडुक्कर तर भंडाऱ्याजवळ बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाच्या कार्यालयात आहे.
४भंडारा जिल्ह्यातील जंगलामध्ये अनेक तलाव असून या तलावाला लागून लोकांच्या आहेत. मात्र दिवसेंदिवस अनेकांनी या तलावात अतिक्रमण करून तलावात शेती करणे सुरु केले आहे. परिणामी तलावात पाणी कमी व जंगलात लोकांचे हस्तक्षेप जास्त. यामुळे वन्यप्राणी इकडे तिकडे पळत आहेत व पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
शिकारी कुत्रे व विद्युत प्रवाहाने शिकार
भंडारा जिल्ह्यात जंगलव्याप्त गावात शिकारी कुत्रे व विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने अनेकदा शिकारी करतात अशी बरीच प्रकरणे वनविभागाने उघडकीस आणली.
अवैध वृक्षतोडही कारणीभूत
बेरोजगारीचीही झळ शहरासोबतच ग्रामीण भागात पोहचली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांनी जंगल तोडून लाकडे विकण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. त्यामुळे जंगले ओस पडू लागली आहेत.
अपघात की शिकार!
अपघातानंतर वनविभागाचे वाहन शोधण्यासाठी कधी शर्थीचे प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ठार झालेल्या वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांच्यातील मौल्यवान अवयव काढून नंतर त्यांना अपघाताचे रुप देण्यात तर आले नाही, अशीही शंका आहे.
रात्रीची गस्त आवश्यक
ज्या जंगलातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग गेलेले आहेत त्या रस्त्यावरून रात्री व दिवस वनविभागाचे एक वाहन २४ तास गस्तीवर ठेवावे.
वनउपज नाक्याची गरज
जिल्ह्यात संभावित व अपघातग्रस्त ठिकाणी वनउपज नाके उभारण्यात यावे. जेणेकरून वन्यप्राण्यांच्या शिकारीची माहिती मिळाली तर किमान वाहनांची चौकशी करता येईल.
वन्यप्राणी गावाकडे
दिवसेंदिवस जंगलाची संख्या कमी होत आहे. पाण्याचा व चराईचा अभाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेताना दिसतात. यामुळे ते सैरावैरा पळत सुटतात व अवैध शिकारीसह अपघाताला बळी पडतात. त्यामुळे मानवाचे जंगलातील वाढते हस्तक्षेप थांबविण्याची गरज आहे.