भंडारा : सध्या खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ मोठय़ा प्रमाणात वाढलेले आहे. वाहनामध्ये प्रवासी कोंबून भरधाव वाहने धावत असल्याने अपघात झाल्यास मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध प्रवासी वाहतुकीस प्रवाशांची जोखीम कोण घेणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. भंडारा शहरातून ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. यात प्रवाशांची सुरक्षा, गाडीची बैठक व्यवस्था व त्यात बसविण्यात येणारे प्रवासी याची पाहणी केली असतावरील वास्तव समोर आले. भंडारा शहरातून तुमसर, पवनी, वरठी, मोहाडी, साकोली, लाखनी या मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. सहा, आठ आसनी वाहनातही १५ ते २0 प्रवासी कोंबून भरले जातात.धावपळीच्या काळात कोणाला वेळ नसल्याने अनेक जण मिळेल त्या वाहनाने गाव जवळ करण्याचा प्रयत्न करीत असतात. तुमसर भंडारा या ठिकाणची बाजारपेठ मोठी असल्याने दिवसाकरीता या दोन्ही शहरात लाखोंची उलाढाल होत असते. शासकीय व इतर कामांसाठी हजारो नागरिक ग्रामीण भागातून शहरात येत असतात. परंतु ग्रामीण भागात वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने ऑटो रिक्षा किंवा कालीपिली जीप, अँपे या वाहनाने प्रवास करावा लागतो. मात्र खासगी वाहनातून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात येत असल्याचे गाडीचा कधी अपघात होईल याची शाश्वती नसते. एका फेरीत जास्त पैसा कमविण्याच्या प्रयत्नात वाहनचालक प्रवासी कोंबून बसवितात. चालकाच्या आसनावरही प्रवासी बसविण्यात येत असल्याने चालकाला अगदी एका पायावर वाहन चालवावे लागते. त्यातच खड्डे चुकविताना प्रसंगी अपघातही होतात. त्यात निष्पात प्रवाशांना जीव गमवावा लागतो. या प्रकाराकडे मात्र पोलीस वाहतूक विभाग आणि परिवहन विभागाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे. दहावीपेक्षा कमी शिक्षण असलेल्यांना परिवहन विभाग वाहन चालविण्याचा परवाना देत नाही. त्यामुळे विनापरवानाच वाहने चालविली जातात. अपघात होवून प्रवाशांचा मृत्यू झाल्यास प्रवाशाला भरपाइृची रक्कमही मिळत नाही. या अपघाताची दखलही घेतली जात नाही.नोकर्या मिळत नाही, दुसरा कामधंदा नाही, त्यामुळे अनेक जण कर्ज काढून प्रवासी गाडी घेतात. गाडीचा हप्ता व पोलिसांचाही हप्ता देण्यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशी बसवून पैसे मिळविण्याकडे कल असतो. याशिवाय वाहनांची संध्या जास्त झाल्याने दिवसातून जास्त फेर्या होत नसल्यामुळे वाहनधारकांना जीवावर उदार होवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरावे लागते.ज्या मार्गावर अशी वाहतुक चालते त्या सर्व मार्गावर वाहतूक पोलीस आहेत मात्र या वाहतुक पोलिसांच्या हातात पेन आणि पावती पुस्तक असतो. महिना झाला म्हणजे त्यांना वसुलीचे टार्गेट पूर्ण करून द्यावे लागते. त्यामुळे ते अशा वाहनांमध्ये प्रवाशी किती आहेत, हे पाहण्यापेक्षा वाहनधारकाने पावती फाडली का हेच पाहतात. जे वाहनधारक हप्ता देत नाहीत त्यांच्या वाहनविरूद्ध कारवाई करतात. (वार्ताहर)
प्रवाशांच्या जीवाची कोण घेणार हमी?
By admin | Updated: May 30, 2014 23:29 IST