प्रवाशांच्या जीवाची कोण घेणार हमी?
By Admin | Updated: June 17, 2015 01:14 IST2015-06-17T01:14:36+5:302015-06-17T01:14:36+5:30
सध्या खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. प्रवासी कोंबून ही वाहने भरधाव जात असल्याने

प्रवाशांच्या जीवाची कोण घेणार हमी?
गोंदिया : सध्या खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. प्रवासी कोंबून ही वाहने भरधाव जात असल्याने अपघात झाल्यास मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध प्रवासी वाहतुकीत प्रवाशांची जोखीम कोण घेणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. यात प्रवाशांची सुरक्षा, गाडीची बैठक व्यवस्था व त्यात बसविण्यात येणारे प्रवासी याची पाहणी केली असता वास्तव चित्र दृष्टीस पडते. शहरातून आमगाव, गारेगाव, तिरोडा, बालाघाट या मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सहा आठ आसनी वाहनातही १५ ते २० प्रवासी कोंबून भरली जातात, हे विशेष.
धावपळीच्या काळात कुणालाही वेळ नसल्याने बरेच प्रवासी मिळेल त्या वाहनाने गाव जवळ करण्याचा प्रयत्न करीत असतात. शासकीय व निमशासकीय कामासाठी हजारो नागरिक ग्रामीण भागातून शहरात येत असतात. परंतु ग्रामीण भागात वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने आॅटो रिक्षा किंवा काळीपिवळी टॅक्सी व अन्य वाहनाने प्रवास करावा लागातो. मात्र खासगी वाहनातून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात येत असल्याने गाडीचा कधी अपघात होईल याची शाश्वती नसते. एका फेरीत जास्त पैसा कमविण्याच्या प्रयत्नात वाहनचालक प्रवासी कोंबून बसवितात. चालकांच्या आसनावरही प्रवासी बसविण्यात येत असल्याने चालकांना अगदी एका पायावर वाहन चालवावे लागते. त्यातच खड्डे चुकविताना प्रसंगी अपघातही होतात. त्यात निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागतो. या प्रकाराकडे मात्र पोलीस, वाहतूक विभाग आणि परिवहन विभागाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे. दहावीपेक्षा कमी शिक्षण असलेल्यांना परिवहन विभाग चालविण्याचा परवाना देत नाही. त्यामुळे विनापरवानाच वाहने चालविली जातात. अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्यास प्रवाशाला नुकसान भरपाईची रक्कमही मिळत नाही. या अपघाताची दखल घेतली जात नाही.
त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशी बसवून पैसे मिळविण्याकडे कल असतो. याशिवाय वाहनांची संख्या जास्त झाल्याने दिवसातून जास्त फेऱ्या होत नसल्यामुळे वाहनधारकांना जीवावर उदार होऊन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरावे लागते. ज्या मार्गावर अशी वाहतूक चालते त्या सर्व मार्गावर वाहतूक पोलिसांच्या हातात पेन आणि पावती पुस्तक असते. महिना आला म्हणजे त्यांना वसुलीचे टार्गेट पुर्ण करुन द्यावे लागते. यामुळे ते अशा वाहनांमध्ये प्रवाशी किती आहेत. हे वाहण्यापेक्षा वाहनधारकांने पावती फाडली का हेच पाहतात. जे वाहनधारक हप्ता देत नाहीत त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाते.(प्रतिनिधी)