पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी दारू व सट्ट्याचे अवैध विक्रेते खुलेआम व्यवसाय करीत आहेत. या विक्रेत्यांना कमी वेळात जास्त पैसा कमविण्याचा हाच एक उपाय दिसतो आहे. कुणी चहाच्या केटलीतून तर कुणी 'एक पव्वे पे एक अंडा फ्री' म्हणून ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. या अवैध व्यवसाईकावर आळा कोण घालणार, याला अभय कुणाचे आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. पवनी तालुका विविध पर्यटनस्थळांनी नटलेला आहे. या तालुक्याची लोकसंख्या जवळपास २ लाख असून १५७ गावांचा समावेश आहे. या तालुक्या अंतर्गत दोन पोलीस ठाणे आहत. यात पवनी व अड्याळचा समावेश आहे. तालुक्यात एकूण १२ शासकीय परवाना असलेले दारू दुकाने आहेत.भुयार येथे जवळपास पाच दारू विक्रेते आहेत. कुणी पाणटपरीवरून दारू विक्री केल्या जात आहे. जिल्हा परिषद शाळेच्या आवार भिंतीला लागून तेलाच्या केटलीतून दारूचे पव्वे काढून विक्री करतानाचे चित्र पाहायला मिळत आहेत. आजगाव येथे जवळपास १५ अवैध व्यवसाय व सट्टा व्यवसाईक आहेत.बसस्थानकावर पानटपरीतून दारू विक्री केल्या जात आहे. आजगावपासून तीन कि़मी. अंतरावर खैरी गाव आहे. येथे शासकीय परवाना असलेली दारू दुकान आहे. ही दुकान गावापासून एक कि़मी. अंतरावर आहे. एकट्या आजगावात दररोज हजारो रूपयांची दारू विक्री केली जाते. तंटे गावातच मिटविण्यात यावे, म्हणून गावात तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात येते. गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये पोलीस पाटलाची नियुक्ती केल्या जाते. मात्र हे फक्त शोभेची वास्तू ठरत आहेत. अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटूंब रस्त्यावर आले आहेत. नवेगाव बाजार येथील लोकसंख्या ३०० आहे. मात्र दारू विक्रेते १० आहेत. येथे मोहफुलांची जास्त प्रमाणात दारू विक्री केली जाते. सायतानगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागूनच मोहफुलाची अवैध दारू विक्री केल्या जात असल्याचा प्रकार सुरू आहे. दारू बंदी करण्याकरीता महिला संघटनेनी पुढाकार घेतला होता. मात्र दोन दिवस बंद ठेवला जातो व तिसऱ्या दिवसी पुन्हा जैसे थे स्थिती पाहायला मिळत आहे. (वार्ताहर)
अवैध दारूविक्रेत्यांना अभय कुणाचे?
By admin | Updated: January 10, 2015 22:50 IST