कृषी संशोधन केंद्र ठरले पांढरा हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:20 IST2017-04-25T00:20:44+5:302017-04-25T00:20:44+5:30
निसर्गाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव व जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रजातीच्या अभावामुळे साकोली तालुक्यातील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत आहे.

कृषी संशोधन केंद्र ठरले पांढरा हत्ती
साकोलीतील प्रकार : उत्पन्न देणारी प्रजाती संशोधित करू शकले नाही
शिवशंकर बावनकुळे साकोली
निसर्गाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव व जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रजातीच्या अभावामुळे साकोली तालुक्यातील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत आहे. अधिक उत्पन्न देणाऱ्या धान प्रजातीच्या अभावामुळे उत्पादन खर्च व प्रती हेक्टरी धानाचे उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे वास्तव आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे संवर्धन करण्याकरिता वर्ष १९६४ मध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठाअंतर्गत साकोली येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. मागील ५० वर्षाच्या कालावधीत संशोधन केंद्रावर कोट्यवधी खर्च करून २००३ मध्ये पी.व्ही.के. गणेश या धानाची प्रजात संशोधित करण्यात आली. हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन होत असून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात ५० वर्षानंतर १० हजार हेक्टरमध्ये धानाची लागवड करण्यात आली.
सन २०१२ या वर्षात पी.व्ही.के. किसान ही धानाची प्रजात संशोधित करण्यात आली. पूर्व विदर्भात या प्रजातीची लागवड ९ ते १० हजार हेक्टरमध्ये लागवड केली जाते. हेक्टरी उत्पादन ४० ते ५० क्विंटल होते. निसर्गाने साथ दिल्यानंतर. हे उत्पादन सुद्धा शेतकऱ्याला परवडणारे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज वाढत आहे.
आजच्या स्थितीमध्ये प्रती एकर खर्च व उत्पादन अशा प्रकारे आहे. धानबियाणे ७०० रूपये, दोनदा नांगरणी व चिखल करणे २७०० रूपये, पऱ्हे खोदणे व रोवणी २४०० रूपये, रासायनिक खत २००० रूपये, निंदन १००० रूपये, कापणी २००० रूपये, औषध फवारणी १०००, मळणी १००० रूपये असा एकूण खर्च १२,८०० रूपये आहे. धानाचा आधारभूत दर १४७० रूपये आहे. एकरी सरासरी १३ क्विंटल उत्त्पन्न झाले तर १९ हजार उत्पन्न होऊ शकते. परंतु निसर्गाची अवकृपा झाली तर शेतकऱ्यांना काहीच शिल्लक राहत नाही.
पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत कार्यक्षम संशोधन केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक होत असताना सुद्धा हे केंद्र शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक उत्पन्न देणारी प्रजाती संशोधित करू शकले नाही. शासनाचा कोट्यवधीचा खर्च व्यर्थ जात आहे. या केंद्राने संशोधित केलेल्या धान प्रजाती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत.
कधी दुष्काळ तर कधी किड यामुळे शेती उत्पादनात मागील १५ ते २० वर्षात कमालिची घट झाली. अधिक उत्पादनाच्या नादात रासायनिक खत व औषधाचा अत्याधिक वापरामुळे जमीन बंजर झाली. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, त्यांना तांत्रिक शेतीचे धडे मिळावे. या उद्देशाने कृषी संशोधन केंद्राची स्थापना असली तरी येथे सोयी सुविधांअभावी हे केंद्र नावाचेच ठरत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
शेतकरी नैसर्गिक आपत्ती आली असता मार्गदर्शन घेत नाही. रासायनिक खत व औषधांचा वापर योग्य प्रमाणात न केल्यामुळे उत्पन्नात घट होते व खर्चात वाढ होते. जमिनीचा प्रकार व पाण्याचे नियोजन याचा विचार न करता शेतकरी बियाण्यांचा वापर करतो. त्यामुळे सुद्धा उत्पन्नात घट होते. उत्पादन खर्च मात्र कमी होत नाही. उत्पादन वाढीकरिता शेतकऱ्यांनी समन्वय साधून कृषी विभागाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
-डॉ.जी.आर. शामकुवर,
वरिष्ठ भात पैदासकार कृषी संशोधन केंद्र, साकोली.