मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:42+5:302021-06-06T04:26:42+5:30
शासनाने जरी शिथिलता दिली असली तरी मात्र सर्वांनीच अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक ...

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको
शासनाने जरी शिथिलता दिली असली तरी मात्र सर्वांनीच अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले होते. यावेळी बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तर भंडारा जिल्ह्यात मृत्यूचा आकडादेखील वाढला होता. त्यानंतर आता मे महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सरकारकडून आधी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत त्यानंतर आता सकाळी सात ते दुपारी दोन वाजतापर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. आज प्रत्येक गोष्टीत मोबाईल ही गरजेची गोष्ट बनली असून कोरोनात अनेकांचा मोबाईल बिघडला आहे. अनेक दिवस बंद असलेली मोबाईलचे दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बॉक्स
सॅनिटायझरचा वापर वाढल्याने मोबाईलमध्ये बिघाड
स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. यासोबतच अनेक जण नवीन मोबाईल खरेदीसाठी दुकानात येत आहेत. मात्र अनेकांचे म्हणणे असे आहे की मोबाईल स्क्रीन टच खराब झाला असून त्यामुळे मोबाईल स्क्रीन टच काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत.
बॉक्स
मागील दीड महिन्यापासून मोबाईलची दुकाने होती बंद
कोरोना संसर्गाची राज्यात दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने कडक संचारबंदी केली होती. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यातील मोबाईल दुकानांसह इतर दुकानेही बंद होती. सुरुवातीला काही तास दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली तरी अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
बॉक्स
नवीन मोबाईल खरेदीत वाढ
मोबाईल हा आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक काम हे आजकाल ऑनलाईन होत असून आता निर्बंध शिथिल केल्याने दुकानांमध्ये जात आहेत.
कोट
मोबाईल दुरुस्त करण्यासाठी आलो होतो. मोबाईल दुरुस्तीविना घरातच पडून होता. आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल लागतोच, पोरांनाही मोबाईल पाहिजे. म्हणून दुरुस्त करण्यासाठी आलो होतो. मात्र घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहे.
दिनेश वासनिक, ग्राहक
कोट
मोबाईलचा स्क्रीन टच खराब झाल्याने मोबाईल काम करत नाही. कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे आता मोबाईल दुकाने उघडली असल्याने अनेकांना ग्रामीणमधील अनेकांना दिलासा मिळाला आहे.
गणेश शेंडे, ग्राहक
दीड महिन्यानंतर उघडले शटर
कोट
गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच मोबाईल आज गरज बनली आहे. त्यामुळे अनेकजण मोबाईल दुरुस्तीसाठी किंवा नवीन मोबाईल खरेदीसाठी दुकानात येत आहेत. मात्र आल्याबरोबर मी ग्राहकांना हातावर पहिल्यांदा सॅनिटायझर व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. संचारबंदीत दुकान बंदच होते त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
प्रवीण बावनकर, मोबाईल विक्रेता
कोट
भंडारा जिल्ह्यात कोरोना सर्वाधिक एप्रिल महिन्यात वाढला होता. त्यामुळे दुकान बंदच ठेवले होते. आता नियमात शिथिलता मिळाल्याने दुकान सुरू केले आहे. ग्राहकही मोबाईल दुरुस्तीसाठी येत आहेत. आता दुकाने उघडली आहेत मात्र झालेले नुकसान भरून काढता येणार नाही. कोरोना नियमांचे ग्राहकांकडूनही पालन होत आहे.
संदिप दूधबरई, मोबाईल विक्रेता