हवामान खात्याचा अंदाज : शेतकरी चिंतेत

By Admin | Updated: June 9, 2014 23:27 IST2014-06-09T23:27:07+5:302014-06-09T23:27:07+5:30

मध्य भारतात उलट दिशेने वाहणार्‍या चक्राकार वार्‍याचा प्रभाव व गंगेच्या खोर्‍यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यंदाच्या मान्सूनसाठी अद्याप अनुकूल वातावरण तयार झालेले नाही.

Weather Department Style: Farmers Concern | हवामान खात्याचा अंदाज : शेतकरी चिंतेत

हवामान खात्याचा अंदाज : शेतकरी चिंतेत

मान्सूनचे आगमन लांबणीवर
भंडारा : मध्य भारतात उलट दिशेने वाहणार्‍या चक्राकार वार्‍याचा प्रभाव व गंगेच्या खोर्‍यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यंदाच्या मान्सूनसाठी अद्याप अनुकूल वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे विदर्भात १५ जूननंतर मान्सून येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे.
यंदाचा उन्हाचा तडाखा मोठय़ा प्रमाणात जाणवला. ४५ डिग्रीपर्यंतच्या तापमानाने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. मध्यंतरी वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मात्र ढगाळ वातावरणाने नागरिकांना दिलासा दिला. मान्सूनची प्रतीक्षा नागरीक व शेतकरी करीत आहेत. उन्हाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. त्यामुळे मान्सूनच्या पावसाचा आनंद घेण्याकरिता आता नागरिक उत्सुक आहेत.
यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होत आहे. मान्सूनकरिता अजूनही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. मान्सूनला उशिरा होत असल्याने काही दिवस उन्हाचा उकाडा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. केरळमध्ये ४ ते ५ जून रोजी मान्सून पोहोचणार, असा अंदाज वर्तविला गेला असून त्या ठिकाणी मान्सूनचे आगमन होताच तेथून चार ते पाच दिवसात विदर्भातही मान्सून येण्याची शक्यता असते. मात्र गंगेच्या खोर्‍यात पुरेसा कमी दाबाचा पट्टा अजूनही निर्माण झाला नाही.
मध्य भारतातही उलट दिशेने चक्रिय वारे वाहत आहे. त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार आहे. अशा परिस्थितीत मान्सून पश्‍चिम घाटात अडकून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व बदलामुळे यंदाचा मान्सून १५ ते १८ जून नंतरच येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. जूनमध्ये बेताचाच पाऊस पडणार असून जुलै महिन्यात चांगला पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्याची ४६.0 डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता अजूनही जाणवत आहे. आता तापमानात घट होणार असून लवकरच ढगाळ वातावरण नागरिकांना दिलासा देणार आहे. ढगाळ वातावरणातही काही दिवस उकाडा कायम राहणार असून मान्सूनच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होणार आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र यंदा मान्सून वेळेवर येणार नसल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात पर्यावरण अभ्यासक राजकमल जोब यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, गंगेच्या खोर्‍यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे व मध्य भारतात चक्रीय वारे उलट दिशेने वाहत आहे. मान्सूनसाठी ही परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे यंदा मान्सून १५ ते २0 जूननंतर येण्याची शक्यता आहे.
(नगर प्रतिनिधी)
 

Web Title: Weather Department Style: Farmers Concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.