सोंड्याटोल्यातून पाण्याचा उपसा

By Admin | Updated: September 12, 2016 00:28 IST2016-09-12T00:28:23+5:302016-09-12T00:28:23+5:30

बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर तलावात सोडणे सध्या सुरु आहे. चांदपूर तलावात सुमारे ५० टक्के जलसाठा झाला आहे.

Water pump | सोंड्याटोल्यातून पाण्याचा उपसा

सोंड्याटोल्यातून पाण्याचा उपसा

कालवा फुटल्याने नदीत प्रवाह : चांदपूर तलाव ५०.६७ टक्के जलसाठा
तुमसर : बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर तलावात सोडणे सध्या सुरु आहे. चांदपूर तलावात सुमारे ५० टक्के जलसाठा झाला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेच्या नऊपैकी सात मशीन्स सुरु आहे. चांदपुर तलावातील पाणी सिहोरा परिसरातील गावांना खरीप पिकांकरिता मिळणार आहे. बावनथडी प्रकल्पाचा कालवा फुटल्याने नदीत पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती आहे.
सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेवर सुमारे ३५ लाखांचे वीज बिल थकीत होते. याकरिता सिहोरा परिसरात राजकीय पक्षांनी आंदोलने करुन शासनाचे लक्ष आकर्षीत केले होते. आ. चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची भेट घेवून थकीत वीज बिलाकरिता प्रयत्न केले. राज्य शासनाने १५ लाखांचा निधी देण्याचे जाहिर केले. मागील आठ ते दहा दिवसापासून बावनथडी नदीतून चांदपूर तलावात पाणी उपसा करण्यात येत आहे. चांदपूर तलावात सुमारे ३५ टक्के जलसाठा यामुळे उपलब्ध झाला आहे. खरीप व रब्बी पिकांकरिता हा जलसाठा उपलब्ध करण्यात येणार आहे.
सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावांना चांदपूर जलाशयातून शेती सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होते. तलावात मासेमारी सुध्दा करण्यात येते. यावर्षी पाऊस न आल्याने तलाव रिकामाच आहे. केवळ सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेमुळे पाणी उपसा केल्याने तलावात किमान जलसाठा दिसत आहे. यापूर्वीच पाणी उपसा करण्याची गरज होती. अर्धा पावसाळा निघून गेल्यानंतर पाणी उपसण्याला सुरुवात झाली. पाणी उपशण्याचे नियोजन किमान उन्हाळ्यात करण्याची गरज आहे. तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार येथे दिसून येतो. जलसाठवण योजनेवर लाखोंचा निधी खर्च करण्यात येतो. येथे केवळ पाणी उपसा करुन तलावात सोडण्याकरिताच मोठ्या अग्नीदिव्यातून जावे लागते.
या जलसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांसोबतच पर्यावरणालाही येथे फायदयाचा ठरतो. हे विशेष. १२ सप्टेंबरपासून येरली परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उजवा कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. १५ सप्टेंबरपासून डावा कालव्याअंतर्गत सिहोरा, चुल्हाड, रेंगेपार, परसवाडा (सि) परिसरात शेतकऱ्यांकरिता पाणी सोडण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

बावनथडी नदीतील प्रवाह व येवा यानुसार पाणी उपसा करण्यात येतो. खरीप व रब्बी पिकांकराित मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. पाणी उपश्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या चांदपूर तलावात ५०.६७ टक्के जलसाठा आहे.
- सुरेश वाईदेशकर,
शाखा अभियंता, चांदपूर

Web Title: Water pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.