वैनगंगा नदीला जलपर्णीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:01:05+5:30
भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प्रकल्पामुळे वैनगंगेचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी बंद झाले असून पाण्यावर जलपर्णी दिवसेंदिवस वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या वैनगंगा नदीला जलपर्णीचा विळखा वाढत चालला असून नदीचे पाणी दुषित झाले आहे. नदीपात्रातील पाण्यावर ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पतीचे आच्छादन वाढले असून पाण्यावर शेवाळ पसरले आहे. त्यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरत असून नदीकाठच्या नागरिकांसह शहरवासीयांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.
भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प्रकल्पामुळे वैनगंगेचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी बंद झाले असून पाण्यावर जलपर्णी दिवसेंदिवस वाढत आहे. यातच नदीपात्रात अनेक गावातील सांडपाणी देखील मिसळत असून नागनदीचे पाणी सोडण्यात येत असल्याने वैनगंगा दुषित होत चालली आहे.
नदीकाठच्या नागरिकांना दूषीत पाण्याने विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. शहरापासून अवघ्या काही अंतरावर वैनगंगा नदी असल्याने येथे अनेक तरुण जमा होतात.
अनेकदा शेतकरी नदीमध्ये मृत जनावरे टाकतात. तसेच ठिकठिकाणचा कचरा व सांडपाणी नदीत मिसळत असल्याने नदी धोका वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने वैनगंगा नदी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी गत काही वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. अनेकदा आंदोलन व निवेदन देवून नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात आले नाही. याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात नदीचे पाणी पिण्यास धोकादयक ठरणार आहे. शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान मंजूर होवूनही याकडे दुर्लक्ष आहे. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
नदीच्या पाण्याला हिरवट-लालसर रंग
नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमिकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर लाल झाला आहे.