खोलमारा नदीघाटावर वाळूमाफियांची दबंगगिरी
By Admin | Updated: November 11, 2014 22:34 IST2014-11-11T22:34:20+5:302014-11-11T22:34:20+5:30
लाखांदूर तालुक्यातील खोलमारा (जुना) येथील नदी घाटावर वाळू माफीयांची दबंगगिरी सुरु असून रोजच रात्री व दिवसा रेतीची चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र या वाळूमाफीयांकडून ग्रामस्थांना विविध

खोलमारा नदीघाटावर वाळूमाफियांची दबंगगिरी
बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील खोलमारा (जुना) येथील नदी घाटावर वाळू माफीयांची दबंगगिरी सुरु असून रोजच रात्री व दिवसा रेतीची चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र या वाळूमाफीयांकडून ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोजच या नदीघाटावरून ५० ते ६० ट्रीप रात्री बेरात्री चोरटी वाहतूक होत असताना सुद्धा अजूनपर्यंत महसूल विभाग कर्मचारी अथवा पोलीस विभागाने एकाही ट्रॅक्टर चालकावर कारवाई केली नसल्याने ग्रामस्थात संबंधित विभागाविषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाने अजूनपर्यंत कोणत्याही रेती घाटाचा लिलाव केला नाही. सध्या बारव्हा परिसरात विविध विकास कामांना गती आली आहे. संबंधित बांधकामातील मुख्य घटक म्हणून रेतीकडे बघितले जाते. सध्या खोलमारा (जुना) या रेतीघाटावरील वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील तई, बेलाटी, बारव्हा, तावशी, मासळ, हरदोली आदी गावातील वाळू माफीये येथून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी करीत आहेत. रोजचे ५० ते ६० ट्रीप रेती चोरट्या मार्गाने जात असून कोणताही महसूल विभागाचा कर्मचारी ढुंकूनही पाहत नाही आणि एखाद्या दिवशी आलेच तर सदर ट्रॅक्टरवर कारवाई न करता सेटींग करण्यात येत असल्याची ओरड आहे. आज दि. ११ नोव्हेंबर रोजी दिघोरी पोलीस यांनी खोलमारा नदीघाटावर पहाटेच्या सुमारास धाड घातली. त्यावेळी एक ट्रॅक्टर रेती भरलेला मिळाल्याची ग्रामस्थात चर्चा आहे. मात्र त्याच्याकडून संबंधित ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता नदीतूनच रेती भरलेला ट्रॅक्टर सोडून सेटींग करण्यात आली असावी अशी ग्रामस्थात दबक्या आवाजात चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्यात रेती माफियांवर लगाम लावण्यासाठी प्रशासनातर्फे विविध ठिकाणी धाड घालण्यात येत आहे. ग्रामीण क्षेत्रात मात्र रेती तस्करांवर मेहरनजर का? असा सवालविचारत आहेत. (वार्ताहर)