प्रभाग की वॉर्ड?
By Admin | Updated: July 23, 2015 00:25 IST2015-07-23T00:25:45+5:302015-07-23T00:25:45+5:30
नगरपालिकांमध्ये राबवली जाणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून देण्याची...

प्रभाग की वॉर्ड?
नगरसेवक संभ्रमात
अध्यादेश अद्याप जारी नाही : सहा महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
भंडारा : नगरपालिकांमध्ये राबवली जाणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून देण्याची जुनी पद्धत पुन्हा अंमलात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सहा महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशन काळात घेतला होता. मात्र, या निर्णयाचा अध्यादेश अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे नगरपालिकेची आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार की प्रभाग पद्धतीने, असा संभ्रम विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांमध्ये निर्माण झाला आहे.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी वॉर्डनिहाय निवडणूक पद्धत बंद करून एका प्रभागातून दोन-तीन नगरसेवक निवडून देण्याची पद्धत सुरू केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण लागू केल्यानंतरही वॉर्ड रचनेच्या थेट निवडणुकीत महिला उमेदवार पराभूत होतात. त्यामुळे महिलांचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रमाण वाढवण्याकरिता प्रभाग रचनेचा निर्णय झाला होता. मात्र मागील १0 वर्षांत विविध नगरपालिकांमध्ये एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून येत असल्याने, त्या प्रभागांची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
राज्य सरकारने पुन्हा जुनी वॉर्ड पद्धत अंमलात आणण्याचे ठरवले व मंत्रिमंडळात तसा निर्णयही घेतला. यामुळे एका वॉडार्तून एकच नगरसेवक निवडून येईल व जनतेला नागरी सुविधा पुरवण्यास बांधील राहील. नगर पालिकांमधील नगरसेवकांनी प्रभाग रचनेची पद्धत बंद करण्याची मागणी केली होती.
मागील काँग्रेस सरकारच्या काळात तसा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र त्या सरकारने निर्णय घेतला नव्हता. आता भाजप सरकारने निर्णय घेतला, पण अध्यादेश जारी केलेला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
राज्य शासनाने वॉर्डनिहाय निवडणुका घेण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला आहे. परंतु अद्याप अध्यादेश आलेले नाहीत. भंडारा जिल्ह्यात २०१७ मध्ये निवडणूक होणार आहे. शासनाकडून अध्यादेश येताच त्यांच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.
- रविंद्र देवतळे,
मुख्याधिकारी, भंडारा.
वॉर्ड पद्धतीत गटबाजीचा धोका
गटबाजी व असंतुष्टांच्या बंडखोरीमुळे वॉर्ड पद्धतीत काँग्रेसला धक्का बसायचा. त्यामुळे प्रभाग पद्धत केली तर क्षेत्र वाढेल व बंडखोरीचा फटका बसणार नाही, हा प्रभाग पद्धत लागू करण्यामागे काँग्रेसचा हेतू होता. मात्र आता उलट परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाली नाही. पक्ष वाढला आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंगही झाले आहे. प्रत्येक वॉर्डात निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची मोठी फौज भाजपकडे आहे. यामुळे वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचा धोका आहे.