प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 23, 2014 23:28 IST2014-07-23T23:28:28+5:302014-07-23T23:28:28+5:30
बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पात तथा कालव्यात शेतजमीन गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्यांना प्रकल्प कार्यालयामध्ये उलट खेटे घालावी लागत आहे.

प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा
मोहन भोयर - तुमसर
बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पात तथा कालव्यात शेतजमीन गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्यांना प्रकल्प कार्यालयामध्ये उलट खेटे घालावी लागत आहे. येथे आधी पुनर्वसन नंतर धरण व प्रकल्पबाधितांना मोबदला या नियमाला हरताळ फासला गेला आहे.
तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील सीतेकसा येथे आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) धरण सुमारे ३५ वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली होती. अनेक अडथडे या प्रकल्पाच्या नशिबी आले. ते अडथडे पूर्ण करत सन २०१३ मध्ये प्रकल्प पूर्ण झाला. शेतकऱ्यांच्या जमिनी या धरण व कालव्यात गेल्या शासनाने नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला अजूनपर्यंत दिला नाही.
हिंगणा येथे एकाच गावातील सुमारे ४५ शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. प्रकल्प अधिकारी आता दोन महिन्यात जमिनीचा मोबदला मिळेल असे सांगत आहेत.
आतापर्यंत मोबदल्याची कारवाई का करण्यात आली नाही. तुमसर, देव्हाडी, खापा, मांगली, परसवाडा (दे.), मांढळ, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, माडगी, बाम्हणी, उमरवाडा, कोष्टी, नवरगावसह अनेक गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही.
जिल्हाधिकारी यांचेकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता या प्रकरणी काही ठोस आश्वासन व कारवाई करताना दिसत नाही. येथे शासनाकडून निधी मिळत नाही अशी माहिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात रेटा लावण्याची गरज आहे.