शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 12, 2016 00:14 IST2016-06-12T00:14:36+5:302016-06-12T00:14:36+5:30

मागील काही वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देणारा पाऊस यावर्षी समाधानकारक बरसणार,

Wait for the farmer to be strong rain | शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा

शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा

नजरा आकाशाकडे : १.८१ लाख हेक्टरवर होणार धान लागवड
भंडारा : मागील काही वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देणारा पाऊस यावर्षी समाधानकारक बरसणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे. जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले असून पाऊस बरसणार, असा अंदाज बांधत बळीराजा पेरता झाला आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांची धूळ पेरणी आटोपली आहे. हुलकावणी देणाऱ्या पावसाने नेहमीच हवामान खात्याचा अंदाज चुकविला आहे.
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २०१६-१७ साठी खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यात धान, सोयाबीन, तूर, भुईमुंग, मूग, उडीद, तीळ या पिकांसाठी एकूण १ लाख ९० हजार हेक्टर शेतजमिनीवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी १ लाख ८१ हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे.
मागीलवर्षी खरीप हंगामात १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. यंदा हे क्षेत्र १ हजार हेक्टरने वाढणार आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाच्या सरीही बरसल्या आहेत. ओलिताची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणीला सुरूवात केली आहे.
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी धान लागवडीसाठी ३३ हजार २०० क्विंटल बियाणांची मागणी केली असून १८ हजार ६७७ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे.
तुर ६५० क्विंटल मागणी आणि सोयाबिन ३८०० क्विंटलची मागणी आहे. याशिवाय ८९ हजार ८३५ मेट्रीक टन खताची मागणी असून त्यापैकी ७४ हजार ४०० मेट्रीक टन मंजूर असून १६ हजार ८०६ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. असे असतानाही दरवर्षी बियाणे आणि खत व किटकनाशकांचा कृत्रिम तुटवडा जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असतो. (नगर प्रतिनिधी)

आता तपासणी पथकात शेतकरीही
बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेत तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या भरारी पथकात दोन शेतकरी साक्षीदार म्हणून राहतील. यात दोषी कृषी केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सहा दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस
जिल्ह्यात ४८२ कृषी केंद्र असून १९० कृषी केंद्र, २०९ खते आणि १२७ किटकनाशकांच्या दुकानांची भरारी पथकाने तपासणी केली. यामध्ये ६ दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली असून दोषी आढळलेल्या कृषी केंद्रांना बियाणे व खते विक्री बंद करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे.
यावर्षीही तरी शेती पिकू दे, शेतकऱ्यांची आर्त
भंडारा जिल्हा हा धानशेतीसाठी पोषक असला तरी मागील काही वर्षांपासून धान शेती ही बेभरवशाची झाली आहे. मागीलवर्षी मृगाचा पाऊस वेळेवर बरसला त्यानंतर पावसाने दडी मारली. तेव्हापासूनच शेतकऱ्यांना संकटाची चाहूल लागणे सुरू झाले होते. त्यानंतर पाऊस बरसला तर रोवणी झाली. त्यानंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. धान लोंबीत येण्याच्या काळात पावसाने दडी मारली. त्यातच किडीचा प्रकोप झाला. कृषी केंद्रात मागितलेले किडनाशक मिळत नव्हते. त्यांच्याकडे उपलब्ध कीडनाशकाने कीड संपली नाही. त्यामुळे यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी मागतील ते किटकनाशक देण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Wait for the farmer to be strong rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.