लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याचे वैभव असलेली वैनगंगा आणि बावनथडीसह विविध नद्यांचे पात्र रेती तस्करांनी पोखरले असून या नद्यांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे. अहोरात्र रेतीचा प्रचंड उपसा नदीपात्रात होत असल्याने पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या समोरून रेतीची खुली तस्करी होत असताना कोणतीही कारवाई होत नाही. रेती तस्करी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरत असून महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.भंडारा जिल्ह्यातील विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेतील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र असे असताना प्रत्येक घाटावर ट्रक, ट्रॅक्टर आणि टिप्पर द्वारे रेतीचे उत्खनन केले जाते. सर्व नियमांना बगल देत जेसीबीने उत्खनन केले जाते. पाच वर्षापूर्वीचे नदीपात्र आणि सद्यस्थितीतील नदीपात्राची अवस्था बघितली तर संपूर्ण पात्र पोखरल्याचे दिसून येते. यामुळे नदीचे सौंदर्य नष्ट झाले आहे. अशीच अवस्था बावनथडी नदीचीही झाली आहे.तुमसर तालुक्यातील अकराही रेतीघाटावर सध्या तस्करांचा धुमाकुळ सुरु आहे. उत्खननासाठी येथे स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. दिवसाढवळ्या रेतीच्या ट्रकची वाहतूक होत आहे. यासर्व प्रकाराने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. नदीच्या तळापर्यंत अर्थात माती दिसेपर्यंत उत्खनन केले जाते. त्यामुळे नदीचे भूमीगत प्रवाह बाधीत होण्याची शक्यता आहे. पर्यावरणीय समतोल ढासळत चालल्याने जलचरांनाही धोका संभवत आहे.नदीचे सौंदर्य आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यांना रेतीतरकरांएवढेच प्रशासनही जबाबदार आहे. खुलेआम रेतीतस्करी होत असताना कुणीही त्यात कारवाईसाठी पुढे येत नाही.उलट वेळेवर रसद पोहचली नाही तर मात्र कारवाईचा सोपस्कार पाडला जातो. या व्यवसायात अनेकांची भागीदारी आहे. त्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती आहे. रेतीतस्करीचा पर्दाफाश केल्यास अनेकजण उघडे पडण्याची शक्यता आहे आणि हेच होऊ न देण्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक रेती घाटावर होणारी तस्करीने आता पर्यावरणाचा प्रश्न निर्माण करीत आहे.वरात इतर घाटांवर का नाहीजिल्हा पोलीस दलाने महसूल विभागाच्या मदतीने वरात काढून पवनी तालुक्याच्या खातखेडा घाटावर गुरुवारी रात्री धाड मारली. मोठी कारवाई केल्याचा डांगोरा पिटण्यात आला. मात्र या धाडीमागील अर्थकारणही पुढे येण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांवर तस्करी सुरु असताना खातखेडा घाटच का निवडला हाही संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील इतर घाटांवर वरात काढण्याची कल्पना का आली नसावी. तुमसर तालुक्यातील बाम्हणी घाटावर शेकडो वाहनांचा डेरा आहे. मात्र त्या ठिकाणी धाड टाकण्याचे साधे सौजन्य कुणी घेत नाही. यातच सर्व काही दडले आहे. नागपूर आणि मध्यप्रदेशातील रेती तस्कर स्थानिकांना हाताशी धारू रेतीची तस्करी करतात. हे उघड गुपित आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणा तस्कारांच्या दावणीला बांधली आहे.
वैनगंगा, बावनथडीचे पात्र रेती तस्करांनी पोखरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 6:00 AM
भंडारा जिल्ह्यातील विशाल पात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेतील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र असे असताना प्रत्येक घाटावर ट्रक, ट्रॅक्टर आणि टिप्पर द्वारे रेतीचे उत्खनन केले जाते. सर्व नियमांना बगल देत जेसीबीने उत्खनन केले जाते.
ठळक मुद्देपर्यावरणाला धोका । नदीचे सौंदर्य नष्ट, महसूलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह