अटीतटीच्या निवडणुकीसाठी आज मतदान
By Admin | Updated: November 19, 2016 00:26 IST2016-11-19T00:26:29+5:302016-11-19T00:26:29+5:30
विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शनिवारला मतदान होत आहे.

अटीतटीच्या निवडणुकीसाठी आज मतदान
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक : निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, तिहेरी लढतीत बाजी कोण मारणार?
भंडारा : विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शनिवारला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार केंद्रांवर मतदान होत असून चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडण्यात आले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन, भाजपचे डॉ.परिणय फुके, काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांच्यासह पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख पक्षाच्या बलाढ्य उमेदवारांमुळे ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नाना पटोले, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपला उमेदवार विजयी होण्याची व्युहरचना आखली आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत ईतकी चुरस कधी दिसून आली नाही. ईतक्या अटीतटीची ही निवडणूक होत आहे. संबंधित पक्षाचे पदाधिकारी विजय आपल्याच पक्षाचा होईल, असे ठासून सांगत आहेत. राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांवर निवडणूक होत असली तरी भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या निवडणुकीची सर्व सुत्रे दिग्गजांकडून हाताळली जात आहेत. नेत्यांनीच व्युहरचना आखली असल्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे निकालाअंतीच स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)
या चार केंद्रांवर होणार मतदान
या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्ह्यात तहसिल कार्यालय सडक अर्जुनी व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया असे चार मतदान केंद्र आहेत.
अन्य पक्षांच्या मतावर विजयाची मदार
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२४, भाजपकडे ११९, काँग्रेसकडे १०५ अशी एकूण मतदार संख्या आहे. यातच या तिन्ही पक्षांनी अपक्ष आणि शिवसेनेची मते जुळविल्यामुळे या पक्षाच्या मतांची संख्या जवळपास बरोबरीत आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकांच्या मतांशिवाय विजयी होणे कठिण असल्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाच्या मतासाठी धडपड चालविली होती.
मते फुटण्याची शक्यता कमी !
ज्या पक्षाच्या गोटात जेवढे मतदार मागील १० दिवसांपासून भ्रमंतीवर आहेत, ते त्यांनाच मतदान करतील अशी शक्यता आहे. १० दिवसांपासून एकत्र असताना कुणी दगा देईल, अशी चिन्हे आजघडीला नाहीत. याशिवाय हे सदस्य ज्या गोटात आहेत, त्यांच्याकडून मतदारांचे भरीव समाधान होत असल्यामुळे मते फुटण्याची शक्यता कमी आहे. निकालाअंतीच हा प्रकार उघडकीस येऊ शकतो. सद्यस्थितीत हे मतदार भंडारा शहरानजिकच्या महानगरात येऊन दाखल झाले असून त्यांचा ताफा शनिवारला सकाळी मतदान केंद्रात पोहोचणार आहे.
‘त्या’ मतदारांच्या मतदानाविषयी संभ्रम
पवनी नगर पालिकेत पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षाशी हातमिळविणी करून ७ नगरसेवकांनी सत्ता स्थापन केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या नगरसेवकांना अपात्र ठरविले. याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील दोन मतदारांना पात्र ठरविण्यात आले तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रकात ३९३ ही संख्या असल्यामुळे ते मतदान करू शकणार की नाही? हा संभ्रम कायम आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विजय उरकुडे यांच्याशी संपर्क साधला असता या मतदारांविषयी राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.