जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचे उल्लंघन
By Admin | Updated: September 26, 2016 00:54 IST2016-09-26T00:54:09+5:302016-09-26T00:54:09+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा शहरात राजरोस वापर सुरू आहे.

जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचे उल्लंघन
गुरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले : मानसिकता बदलण्याची गरज
भंडारा : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा शहरात राजरोस वापर सुरू आहे. प्लॉस्टिकच्या वापरामुळे जैविक प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत मात्र नगरपालिकेतर्फे ठोस दंडात्मक कार्यवाही होत नसल्यामुळे शहरात प्लस्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येते.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वत्र आहे. यामुळे कचरा व्यवस्थापनात अडचणी येतात. प्लास्टिकमधील विघटन न होणाऱ्या रसायनामुळे पर्यावरणाला मुख्य धोका निर्माण झाला आहे. यामध्ये सांडपाणी निचरा करणाऱ्या व्यवस्थेत अडथळे निर्माण होणे, भूगर्भजल प्रदूषित होणे, असे अनेक धोके समाविष्ट आहेत.
शिवाय या प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे जनावरांवर मृत्यू ओढावत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी झाली नाही. परिणामी, ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. त्यामुळे शहरातील बऱ्याच उकीरड्यावर प्लास्टिक बॅग पडलेल्या आढळून येतात.
यामुळे पर्यावरणासह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे नगरपालिका प्रशासन ठोस कार्यवाही करीत नसून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)
अशी आहे कारवाईची तरतूद
प्लास्टिक निबंर्धाबाबत पर्यावरण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार, तयार केलेल्या पर्यावरण संरक्षण नियम ४ नुसार ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे उत्पादन करणे, ते आयात करणे वा त्याचा पुरवठा करणे तसेच विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे; परंतु पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उदासीन असल्यामुळे याकडे कोणीही लक्ष देत नाही.
ग्रामीण व्यावसायिकांकडून दुर्लक्ष
भंडारा शहरातील व्यावसायिकांना ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापर करुन नका, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. या आवाहनाला शहरातील व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र ग्रामीण भागातील बरेच लघू व्यावसायिक शहरात व्यवसाय करताना त्यांकडून प्लास्टिक बंदीकडे दुर्लक्ष होत आहे.
पथके नाहीत
४महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिकवरील बंदीची अंमलबजावणी कठोरपणे होण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा नगरपालिकेला विशेष पथक गठित करण्याचे आदेश दिले होते. प्लास्टिक बंदीला कोलदांडा घालणाऱ्यावर सदर पथके दंडात्मक कारवाई करणार होते; परंतु पालिकेने सदर पथके गठित केली नाहीत.