निवडणुकीपूर्वी करा विदर्भ राज्याचा निर्धार
By Admin | Updated: July 28, 2014 23:21 IST2014-07-28T23:21:42+5:302014-07-28T23:21:42+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांच्या काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भिती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय

निवडणुकीपूर्वी करा विदर्भ राज्याचा निर्धार
विविध संघटनांनी घेतली शपथ : क्रांतीदिनी ‘बस देखो - रेल देखो’ आंदोलन
भंडारा : विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांच्या काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भिती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा काळ हातातून निघून गेला की राज्यकर्त्यांना कोंडीत पकडणे अशक्य आहे तेव्हा विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्याची हीच संधी असून आता हातून जाऊ द्यायची नाही, असा निर्धार स्थानिक सार्वजनिक वाचनालयात झालेल्या सभेत घेण्यात आला.
या सभेला जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोरे, विदर्भ समन्वयक चंद्रकांत वानखेडे, सल्लागार प्रा.शरद पाटील, प्रकाश इटनकर, महासचिव राजीव जगताप, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, अॅड. गोविंद भांडारकर समन्वयक अॅड. कांचन कोतवाल, सुरेश ब्राम्हणकर, अशोक पारधी यांच्यासह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या विदर्भावर शपथ घेतली. तसेच ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून विदर्भात बस देखो रेल देखो च्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याच्या निर्धारही करण्यात आला. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात प्रत्येक प्रवाशाला विदर्भ बंधनाचा धागा बांधण्यात येणार आहे.
प्रमुख मार्गदर्शक चंदक्रांत वानखेडे म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना शिवसेनेच्या विरोधी भूमिकेमुळे विदर्भ वेगळा झाला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भुवणेश्वर येथे वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला आता केंद्रात भाजपेच सरकार बहुमतात आहे. शिवसेनाही दुखावेल, असेही वाटत नाही. मात्र सत्ता येताच भाजपाचा सुर बदलला आहे.
उलट महाराष्ट्रात सत्तांतर होईल, सत्ता आल्यास चार वर्षे राज्य करायचे आणि नंतर विदर्भ राज्य वेगळे करायचे मग पुढील निवडणुक त्या आधारे जिंकायची हा राजकीय डाव आहे तो हाणून पाडत विदर्भ राज्य पदरात पाडण्याची सुवर्णसंधी आहे. हे विधानसभा निवडणुकीपुर्वीच शक्य आहे. प्रास्ताविक सुरे बाम्हणकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. कांचन कोतवाल यांनी केले तर आभार अशोक पारधी यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात विदर्भवादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)