पूर्व विदर्भातील मामा तलावांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 16:22 IST2018-12-12T16:18:27+5:302018-12-12T16:22:10+5:30

गोंडराजे आणि इंग्रजांच्या काळात सिंचनासाठी पूर्व विदर्भात तलावांची निर्मिती करण्यात आली होती. पाच जिल्ह्यात सहा हजारांवर असलेल्या या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे अनेक वषार्पासून दुर्लक्ष होत आहे.

In the Vidarbha, the Mama lakes ignored by govt. | पूर्व विदर्भातील मामा तलावांचे अस्तित्व धोक्यात

पूर्व विदर्भातील मामा तलावांचे अस्तित्व धोक्यात

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्षपाच जिल्ह्यात आहेत सहा हजारांवर तलाव

ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोंडराजे आणि इंग्रजांच्या काळात सिंचनासाठी पूर्व विदर्भात तलावांची निर्मिती करण्यात आली होती. या तलावांना सध्या माजी मालगुजारी तलाव (मामा तलाव) म्हणून ओळखले जाते. पाच जिल्ह्यात सहा हजारांवर असलेल्या या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे अनेक वषार्पासून दुर्लक्ष होत आहे. परिणामी धान उत्पादकांसाठी सिंचनाचा हक्काचा पर्याय असलेल्या मामा तलावांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.
पूर्व विदर्भात सुमारे ३०० वर्षांपूर्वी गोंडराजांच्या साम्राज्यात सिंचनासाठी तलावाची निर्मिती करण्यात आली होती. नंतरच्या काळात ब्रिटीश राजवटीत सर्व तलाव तत्कालीन जमीनदार अर्थात मालगुजारी करणाऱ्या व्यक्तींच्या ताब्यात गेले. त्यामुळे आता स्वातंत्र्यानंतर या सर्व तलावांना माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव म्हणून ओळखले जाते. पूर्व विदर्भात पाच हजार ९९७ माजी मालगुजारी तलाव आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यात २१७, भंडारा जिल्ह्यात १०२५, गोंदिया १३५२, चंद्रपूर १६७८ आणि गडचिरोली जिल्ह्यात १६४५ तलावांचा समावेश आहे. या सर्व तलावांची एकुण सिंचन क्षमता १ लाख १३ हजार ५१८ हेक्टर असून सर्व तलावांची देखभाल जिल्हा परिषदांकडून केली जाते.
या तलावांमुळे सिंचनासोबतच गावातील पिण्याच्या पाण्याची सोयही होत होती. सोबतच या तलावांमध्ये मत्स्यपालन आणि शिंगाडे उत्पादनही घेतले जाते. त्यामुळे हे तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. परंतु अलीकडे या तलावांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. तलावांमध्ये वषार्नुवर्षे गाळ साचला आहे. परिणामी यातून सिंचन होणे अशक्य झाले आहे. अनेक गावातील तलावांवर स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलाव व बोड्या नामशेष होत आहे. या तलावांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदांकडे आहे. परंतु या तलावांसाठी योग्य निधीच मिळत नसल्याने तलाव अखेरच्या घटका मोजत आहे.
मध्यंतरीच्या काळात या तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाने पुढाकार घेतला होता. निधीही उपलब्ध करुन दिला. परंतु इतर योजनांचे होते तसेच मामा तलावांच्या बाबतीतही झाले. आजही गावांगावात असलेले हे तलाव गाळमुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

धान पिकासाठी सर्वाधिक उपयोग
विभाजनापुर्वी भंडारा हा राज्यातील सर्वाधिक तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. या जिल्ह्यात २३७७ मामा तलाव होते. विभाजनानंतर या जिल्ह्याच्या वाट्याला १०२५ तलाव आले. या तलावातून धानासाठी सिंचन केले जात होते. त्यासाठी स्थानिकांनी गाव समित्याही स्थापन केल्या हात्या. मात्र अलीकडे या तलावाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या सिंचन प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागते.

Web Title: In the Vidarbha, the Mama lakes ignored by govt.

टॅग्स :Governmentसरकार