रस्त्याच्या खडीकरणात निकृष्ट साहित्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 00:41 IST2017-04-22T00:41:30+5:302017-04-22T00:41:30+5:30
करडी येथील आंबेडकर वॉर्डात १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून ग्रामपंचायतने खडीकरणाचे काम केले.

रस्त्याच्या खडीकरणात निकृष्ट साहित्याचा वापर
उपोषणाचा इशारा : जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
करडी (पालोरा) : करडी येथील आंबेडकर वॉर्डात १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून ग्रामपंचायतने खडीकरणाचे काम केले. सदर काम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप वॉर्डातील नागरिकांनी केला आहे.
याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्याचे निवेदन अनेकदा देण्यात आले. मात्र ग्रामपंचायत कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे २८ एप्रिलपर्यंत या कामाची चौकशी न झाल्यास १ मे पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या नवेदनातून दिला आहे.
प्रशासनाकडून वारंवार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कामांचा दावा केला जात आहे. मात्र सत्तापक्षांच्या लोकांनीच या दाव्यातील हवा काढली असल्याचे करडी येथील कामात झालेल्या गैरप्रकारावरून दिसून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या खडीकरण कामात गैरप्रकार केलेला असताना त्यांना वाचविण्याचे काम राजकीय मंडळींकडून होत आहे. अखेर धरणे आंदोलन व उपोषणाचा, शांततेचा व अहिंसेचा मार्ग पत्करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
करडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगाच्या तीन लाखांच्या निधीतून आंबेडकर वॉर्डात गॅस गोडावून ते राममंदिर पर्यंतच्या खडीकरणाचे काम हाती घेतले गेले. नुकतेच काम पूर्ण करण्यात आले. कामे ग्रामपंचायत सदस्यांनीच केले असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. खडीकरणाचे काम करताना अंदाजपत्रकाला मुठमाती दिली गेली. अंदाजपत्रकात खडीकरणासाठी ८० एमएम खडीचा वापर करावयाचा होता. मात्र तसे करण्यात आलेले नाही. फक्त ४० एमएम खडीचा पातळ थर टाकून त्यात मोठ्या प्रमाणात मुरुमाचा वापर करून रस्त्याचे काम केले. अंदाजपत्रकाप्रमाणे ९ इंचिचा कोड देणे आवश्यक असताना फक्त ४ इंचीचा कोट देण्यात आला.
खडीकरण कामातील गैरप्रकाराची माहिती संबंधित विभागाच्या अभियंत्याला देण्यात आली. मात्र, अद्याप त्याची चौकशी झालेली नाही. त्यामुळे उपोषाला बसण्याचा इशारा ज्ञानेश्वर हिंगे, अजय तितीरमारे, सुशिल ढोमणे, ग्रामपंचायत सदस्य रंजीत भारतकर, अयुब शेख, शिवशंकर साठवणे, दिलीप पोवनकर, प्रदीप साखरे, अमोल डोहळे व ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)