आयटीआय प्रशिक्षणार्थी ‘अप्रेन्टिस’अभावी बेरोजगार
By Admin | Updated: April 26, 2017 00:35 IST2017-04-26T00:35:31+5:302017-04-26T00:35:31+5:30
व्यावसायीक अभ्यासक्रम करून रोजगार मिळेल या उद्देशाने हजारो सुशिक्षीत युवकांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतले.

आयटीआय प्रशिक्षणार्थी ‘अप्रेन्टिस’अभावी बेरोजगार
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आंदोलनाचा इशारा
भंडारा : व्यावसायीक अभ्यासक्रम करून रोजगार मिळेल या उद्देशाने हजारो सुशिक्षीत युवकांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतले. मात्र जिल्ह्यात उद्योगधंदे असतानाही या युवकांना ‘अप्रेन्टीस’अभावी बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या युवकांना अप्रेन्टीसची संधी द्यावी अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
जिल्ह्यात कोळसा खाण, आयुध निर्माणी, सनफ्लॅग, अशोक लेलँड, एम.एस.ई.बी., एस.टी. महामंडळ यासह अनेक उद्योग व्यवसायांची उभारणी करण्यात आलेली आहे. यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना अप्रेन्टीसची संधी मिळाल्यास शेकडो युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या जिल्ह्यात दिवसागणिक वाढत असल्याचा आरोप या निवेदनातून विजय शहारे यांनी केला आहे.
व्यावसायीक अभ्यासक्रमात मोडणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण मिळते. जिल्ह्यात शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु आहेत. पदवीप्राप्त करण्यापेक्षा व्यवसायीक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र घेऊन उद्योग व्यवसायाला लागण्याकरिता युवक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतात. मात्र मागील काही वर्षांपासून हजारो विद्यार्थी प्रमाणपत्र परीक्षा पास केल्यानंतरही त्यांना अप्रेन्टीस करण्याची संधी प्राप्त झालेली नाही. कुशल कामगार या सदरात मोडणारे हे प्रशिक्षक झाल्यास हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होईल. मात्र कंपन्यांकडून कंपनी तोट्यात चालत असल्याचा बनाम करून केवळ बोटावर मोजण्याइतपत युवकांना सामावून घेतात. उर्वरितांना अप्रेन्टीससाठी मुकावे लागत असल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना अप्रेन्टीसमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी केली आहे.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष मंगला वाडीभस्मे, शहर अध्यक्ष विभा साखरकर, शोभा बावनकर, नितीन वानखेडे, दिनेश बारापात्रे, चौधरी, सोमेश्वर शहारे, शुभम डहाके, गणेश वानखेडे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जिल्ह्यात कार्यरत कंपन्यांनी युवकांना नोकरीत सामावून घ्यावे, ज्या कंपन्या स्थानिकांना काम देत नाही, अशा कंपन्यांना बाद करावे. यासाठी प्रशासनाने समिती नेमून बेरोजगारांना न्याय द्यावा.
- विजय शहारे,
जिल्हाध्यक्ष, मनसे, भंडारा.