लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीवाशी खेळणे झाले आहे. या महामार्गावर दोन ते तीन फूट खोल खड्डे आणि उखडलेले डांबर दिसून येते. महामार्गाचा दर्जा मिळून दोन वर्षे पूर्ण झाली तरी आजही काम सुरू न झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.
या निष्क्रियतेविरोधात १७ ऑक्टोबर रोजी तुमसर शहराजवळील खापा चौफुलीत नागरिक, प्रवासी आणि सामाजिक संघटना यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची घोषणा युवासेना (उद्धवसेना) तुमसर तालुका प्रमुख आणि परसवाडा (देव्हाडी) ग्रामपंचायत उपसरपंच पवन खवास यांनी केली आहे.
तुमसर-मोहाडी-भंडारा या मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या खड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू झाल्या आहेत. अनेकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींनी तर आपले प्राणही गमावले आहेत.
निवेदन देतेवेळी यांची होती प्रमुख उपस्थिती
निवेदन देतेवेळी उद्धवसेनेचे नरेश डहारे, उपसरपंच पवन खवास, जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम, प्रमोद कटरे, दीपक लुटे, विजय चौधरी, प्रकाश खराबे, विनेश गजभिये, नरेश शहारे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महामार्ग प्राधिकरण घेणार का समस्येची दखल ?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र दखल झालीच नाही. निदान १७- तारखेच्या आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
घोषणा होऊनही अद्याप बांधकामाचा पत्ता नाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन वर्षांत महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात आजतागायत बांधकाम सुरूच झालेले नाही. रस्त्याची इतकी दुर्दशा झाली आहे की, आता वाहन चालवताना जीव मुठीत धरावा लागतो. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांना दुखणेही वाढले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची अपेक्षा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मार्ग हस्तांतरित झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या, पण आजही 'महामार्ग' हे नावापुरतेच राहिले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या रोषाचा उद्रेक होण्यापूर्वी भंडारा ते बपेरापर्यंतचे खड्डे बुजवून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ३७कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
Web Summary : Bhandara-Balaghat highway's dangerous potholes prompt citizen protest. Despite repair allocations and promises, construction remains stalled, causing accidents and public anger. Authorities urged to act before further incidents.
Web Summary : भंडारा-बालाघाट राजमार्ग के खतरनाक गड्ढों से नागरिकों में आक्रोश। मरम्मत आवंटन और वादों के बावजूद, निर्माण रुका हुआ है, जिससे दुर्घटनाएँ और सार्वजनिक गुस्सा बढ़ रहा है। अधिकारियों से कार्रवाई का आग्रह।