सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू
By Admin | Updated: April 24, 2016 00:41 IST2016-04-24T00:41:38+5:302016-04-24T00:41:38+5:30
पाणीपट्टीसह अन्य करांचे तीन कोटी रूपयांची शेतकऱ्यांकडे थकबाकी असताना यंदाच्या वसुलीचा आकडा कोटीपर्यंत गाठलेला नाही.

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू
३१.५३ लाख आणायचे कुठून ? : थकीत करांची वसुली थांबली, निर्णयाचे अवघे ६० दिवस, थकीत विद्युत देयकावरुन चिंता
रंजित चिचखेडे चुल्हाड (सिहोरा):
पाणीपट्टीसह अन्य करांचे तीन कोटी रूपयांची शेतकऱ्यांकडे थकबाकी असताना यंदाच्या वसुलीचा आकडा कोटीपर्यंत गाठलेला नाही. त्यामुळे महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या थकीत विद्युत देयकांचा गुंता वाढला आहे. परिणामी या प्रकल्पाचा ‘काऊंटडाऊन’ सुरू झाला आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेती सिंचन क्षमता असलेला बावनथडी नदीवर महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आला आहे. प्रकल्प निर्मितीसाठी ११० कोटी रूपये खर्च करण्यात आले असले तरी, नियोजन शुन्यता व राजकीय ईच्छाशक्तीअभावी हा प्रकल्प अधांतरी आहे. २००७ पासून प्रकल्प नदीपात्रातून पाण्याचा उपसा जलाशयात करण्यात येणार आहे. उपसा करण्यात आलेले पाणी खरीप हंगामात शेतीला देण्यात येणार आहे. परंतु रबी हंगामात ही संपुर्ण शेती ओलीताखाली आणण्याचे प्रयत्न झाले नाही. या प्रकल्पाने २०१३ पर्यंत पाण्याचा नियमित उपसा केला. याच कालावधीत रोटेशन पध्दतीनुसार रबी हंगामात पाण्याचे वाटप झाले.
त्यानंतर २०१४-१५ या कालावधीत नदी पात्रातून पाण्याचा उपसा केल्यानंतर विद्युत देयकाचे ३४ लाख रूपये थकीत असल्याच्या कारणावरून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. विदर्भ पाटबंधारे विभागाचे नियंत्रणात असलेल्या या प्रकल्पाची जबाबदारी पाटबंधारे विभागाला हस्तांतरण न करता देण्यात आली आहे. पाणीपट्टी कराची वसुली पाटबंधारे विभाग करीत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
हस्तांतरण व निर्णयाच्या चर्चेत थकीत विद्युत देयकाचे ४० लाख रूपयापर्यंत पोहोचला. मागील वर्षापासून हा प्रकल्प अंधारात असताना यंदाच्या पावसाळ्यात हा प्रकल्प नदी पात्रातून पाण्याचा उपसा करणार किंवा नाही यासंदर्भात हमी देणारे कुणाचे वक्तव्य नाही. दरम्यान पाटबंधारे विभागाची शेतकऱ्याकडे तीन कोटी रूपयांची थकबाकी आहे. या वसुलीतुन विजेचे देयक देण्याचे निर्देशित करण्यात आले. त्याप्रमाणे मनुष्यबळाचा अभाव असताना सिहोरा पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने ८ लाख ४७ हजार रूपयांची पाणीपट्टी, सेवाकर व अन्य वसुली केली. हा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. या वसुलीने विजेचे देयक देण्याचा पल्ला गाठला नाही. त्यामुळे ३१ लाख ५३ हजार रूपये आणायचे कुठून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
थकीत विद्युत देयकांचा गुंता अद्याप सुटलेला नसून जिल्हास्तरावर चर्चा नाही. यामुळे प्रकल्पासंदर्भात साशंकता निर्माण झाली आहे. येत्या जुलै महिन्यात प्रकल्प पाण्याचा उपसा करीत आहे. तत्पुर्वी प्रकल्पत असणारे पंपगृह, विजेचे उपकरण तथा अन्य साहित्याची देखभाल व दुरूस्ती करण्यात येत आहे. नदी पात्रातून पाणी उपसा करण्यासाठी अवघे ६० दिवस शिल्लक आहेत. परंतु अद्याप उपसा करण्याचे यंत्रणेकडे नियोजन नाही. येत्या खरिप हंगामात शेतीत उत्पादनाचे नियोजनात शेतकरी गुंतला आहे. पाणीपट्टी करांचे देयक प्रभावित झाल्यामुळे राज्य शासनाच्या मदतीवरच प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यालय गुंडाळणार !
कालवा, नहर विभागाचे कार्यालय सांभाळणारे अधिकारी आणि कर्मचारी सिहोरास्थित कार्यालयात नाही. मार्च २०१७ मध्ये निम्म्याहून अधिक कर्मचारी निघून जातील १, २ कर्मचारी राहणार आहेत. यामुळे प्रभारींच्या खांद्यावर डोलारा सुरू ठेवण्याची वेळ आली तर हा विभागच गुंडाळणार असल्याची चिन्हे आहेत. ९ हजार हेक्टर शेती ओलीताखाली आणताना कर्मचाऱ्यांना जिवाचे रान करावे लागणार आहे, राज्य शासनाने रिक्त पदे भरण्याचे सुतोवाच केलेले नाही.
पाटबंधारे विभागाचे कार्यालय अंधारात
वर्षभरापासून सोंड्याटोला प्रकल्प अंधारात ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सिहोरा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची १२ हजारांचे देयके देण्यात न आल्यामुये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. याशिवाय वीज वितरण कंपनीने कार्यालयाचे विद्युत मीटर काढले आहे.
भाजपचे शिष्टमंडळ भेटणार
दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने शेतकऱ्यांनी वसुली दिली नाही. खरिप हंगामात प्रकल्पाला संजीवनी देण्यासाठी भाजपचे माजी जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी, माजी सभापती कलाम शेख, तालुकाध्यक्ष राजेश पटले, विमल कानतोडे, बंडु बनकर, अजय खंगार, अशोक पटले, हिरालाल नागपुरे, बंब बानेवार, सहादेव ढबाले यांचे शिष्टमंडळ जलसंपदामंत्र्यांची भेट घेणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार
आघाडी शासनाच्या काळात प्रकल्पाला संजीवनी देण्यात आली होती. पंरतु आता युती सरकारने दुर्लक्ष करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत येणार आहेत. प्रकल्प सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, प्रतिक्षा कटरे, प्रेरणा तुरकर, प.स. सदस्य अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले, सुप्रिया रहांगडाले, उमेश कटरे, उमेश तुरकर यांनी दिला आहे.