तुमसर क्वारंटाईन सेंटर झाले यातनागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:01:08+5:30
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अडीच महिन्यांपूर्वी संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले. नियमानुसार आणि गाईडलाईन अनुसार मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र येथे कोणत्याच सुविधा दिसत नाही. थातूरमातूर स्वच्छता करून कर्मचारी येथून निघून जातात. त्यानंतर या केंद्राला कुणीच भेट देत नाही.

तुमसर क्वारंटाईन सेंटर झाले यातनागृह
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करून संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. तुमसर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र येथे सुविधांचा अभाव असून १४ दिवस निवासी राहणाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटर यातनागृह झाले आहे. केव्हा एकदा येथून सुटका होते याची प्रतीक्षा येथे क्वारंटीन असलेल्यांना लागलेली असते.
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अडीच महिन्यांपूर्वी संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले. नियमानुसार आणि गाईडलाईन अनुसार मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र येथे कोणत्याच सुविधा दिसत नाही. थातूरमातूर स्वच्छता करून कर्मचारी येथून निघून जातात. त्यानंतर या केंद्राला कुणीच भेट देत नाही. एका क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीने येथील आपबिती सांगून संबंधित केंद्रातील व्हीडीओ आणि फोटो सुद्धा काढून ठेवले आहे. येथील शौचालय घाणीने माखले असून पिचकाºयांनी कोपरे भरले आहे. वऱ्हांड्यात कचऱ्याचा खच पडलेला असून जीन्याच्या पाट्याही तुटल्या आहेत.
येथे वास्तव्यास असलेल्या व परदेशातून आलेल्या एका नागरिकाने स्थानिक प्रशासनाला संपर्क साधून माहिती दिली. परंतु एकमेकांचे नावे सांगून केवळ टोलवाटोलवी करण्यात आली. आता करावे तरी काय असा प्रश्न पडला आहे.
शासकीय मुलींच्या वसतिगृहात सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देऊन दररोज स्वच्छता केली जाते. घाणीचा प्रश्नच येत नाही. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांशी याबाबत वेळोवेळी संपर्क साधून सूचना दिल्या जाते. समस्या असेलच तर त्या त्वरित दूर होतील.
- गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार तुमसर