नागरी सुविधांअभावी रखडले पुनर्वसन
By Admin | Updated: January 6, 2015 22:55 IST2015-01-06T22:55:24+5:302015-01-06T22:55:24+5:30
हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो

नागरी सुविधांअभावी रखडले पुनर्वसन
व्यथा प्रकल्पग्रस्तांची : गोसेखुर्दशिवाय जिल्ह्यातील सिंचन अपूर्ण
भंडारा : हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली होती. परंतु, या प्रकल्पापासून बाधित झालेल्या ३४ गावांपैकी मेंढा, मालची, पाथरी, सावरगाव, पेंढरी, जामगाव याच गावांचे पुर्णत: पुनर्वसन झाले आहे. आणखी २८ गावांचे पुनर्वसन अधांतरी आहे. पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांचा योग्य मोबदल्यासाठी लढा सुरूच आहे. या न्यायासाठी शेतकऱ्यांची एक पिढी गारद होण्याच्या मार्गावर आहे.
गोसीखुर्द प्रकल्प
गोसीखुर्द (इंदिरासागर) धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर धरणाचे काम वेगाने झाले असले तरी बुडीत क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे रखडलेली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर धरणात पाणी अडविल्याने धरणाचे पाणी बाधितांच्या घरापर्यंत पोहचले आहे. भंडारा जिल्ह्यातील ३४ गावांचे २८ नवीन गावठाणावर पुनर्वसन करण्याची योजना होती. पुनर्वसन योजनेवर ७५० कोटी रुपये खर्च झाले. आतापर्यंत मेंढा, मालची, पेंढरी, मकरधोकडा, सिरसघाट, जाख (खोलापूर), पांदी, टाकळी (जुनी) या गावांचे पुर्णत तर सावरगावचे स्वेच्छा पुनर्वसन झाले आहे. या धरणामुळे १४ हजार ९०९ कुटूंब बाधित होऊन ६२ हजार ७९ नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील २,५०४ कुटुंबापैकी ९१६ कुटुंबांचे अद्याप स्थलातरण व्हायचे शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मकरधोकडा, सिरसघाट, संगम, पिपरी ही गावे स्थलांतरीत झाले आहेत.
बावनथडी प्रकल्प
महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सहकार्याने तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीवर हा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या चार गावांचे पुनर्वसन झाले आहे. परंतु या काहींना भूखंड मिळाले नाही तर काहींना सर्वसुविधा देण्यात आलेल्या नसल्याचे सांगून नदी काठावरील काही कुटूंब पुनर्वसित ठिकाणी गेले नाही. यासाठी नदीकाठावरील रेंगेपारवासियांनी १५ आॅगस्ट २०१३ रोजी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी तीन जणांनी ‘जलसमाधी’ घेण्याच्या उद्देशाने पाण्यात उडी घेतली होती. (जिल्हा प्रतिनिधी)