बायपासअभावी मृत्यूच्या दाढेतून रेंगेपारवासीयांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:01:44+5:30
बायपास रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे धोकादायक रस्त्यानेच वाहनांची वाहतूक सुरु आहे. पावसाळ्यात अत्यंत धोका येथे असून रस्ता केव्हा खचेल याचा नेम नाही. भूस्खलनाचा येथे मोठी भीती आहे. मागील एक वर्षांपासून रेंगेपार गावाला बस जाणे बंद आहे. नदी काठावरील मार्गाने बस वाहतूक धोक्याचे असल्याने एसटी महामंडळाने बसगाडी बंद केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्ते सुरक्षित असावेत असा शासनाचा कटाक्ष आहे. परंतु तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथे बायपास रस्त्याअभावी वैनगंगा नदीच्या तीरावरील रस्त्याने मृत्यूच्या दाढेतून वाहतूक सुरु आहे. नदीचे पात्र गावाच्या दिशेकडे झपाट्याने वळत असून वर्षभरापासून एसटी महामंडळाने बस वाहतूकही बंद केली आहे.
तुमसर तालुक्यातील रेंगेपार १३०० लोकवस्तीचे गांव वैनगंगा नदी तीरावरवर वसलेले आहे. या गावाच्या दिशेने वैनगंगेचे पात्र दहा ते बारा वर्षांपासून वाढत आहे. याकरिता शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. धोकादायक घरांसाठी शासनाने भूखंड दिले. अगदी नदी तीराजवळूनच डांबरीकरण रस्ता परसवाडा व त्यापुढे जातो.
बायपास रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे धोकादायक रस्त्यानेच वाहनांची वाहतूक सुरु आहे. पावसाळ्यात अत्यंत धोका येथे असून रस्ता केव्हा खचेल याचा नेम नाही. भूस्खलनाचा येथे मोठी भीती आहे. मागील एक वर्षांपासून रेंगेपार गावाला बस जाणे बंद आहे. नदी काठावरील मार्गाने बस वाहतूक धोक्याचे असल्याने एसटी महामंडळाने बसगाडी बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याविषयी अनेक शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदने दिलेली आहेत.
बांधकाम विभागाने केले सर्व्हेक्षण
तुमसर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे सर्व्हेक्षण केले. बायपास रस्ता बांधकामाकरीता सुमारे सहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सदर प्रस्तावाला शासनाची मंजूरी मिळाल्यानंतरच बायपास रस्त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील दहा वर्षांपासून बायपास रस्त्याची मागणी येथे आहे. अपघातानंतर प्रशासनाला जाग येणार काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. धोकादायक रस्ते बंद करुन सुरक्षित रस्ते बांधकामाला प्रथम प्राधान्य द्या, असा शासनाचा आदेश असतांना सदर रस्त्याकडे कायम दुर्लक्ष दिसत आहे. रेंगेपार- परसवाडा बायपास रस्ता बांधकाम करण्याची मागणी जूनी आहे, याकरिता आतापर्यंत आंदोलने करण्यात आली. परंतु शासनाचे कायम येथे दुर्लक्ष दिसत आहे. अप्रिय घटना घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील. केवळ सहा कोटींचा निधी येथे दिला जात नाही, असे पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी सांगितले.
रेंगेपार येथील बायपास रस्त्याचे सर्व्हेक्षण झाले असून त्यासाठी सहा कोटी निधींची गरज आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर बायपास रस्ता बांधकाम करण्यात येईल.
-डी. एल. शुक्ला,
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तुमसर