त्या धोकादायक दोन्ही विद्युत डीपीचे स्थानांतरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:05+5:302021-07-21T04:24:05+5:30
पवन मस्के यांची मागणी : उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन भंडारा : बेला ते दवडीपार हद्दीतील नाल्यालगत असलेल्या, तसेच पावसाळ्यात पाण्याखाली ...

त्या धोकादायक दोन्ही विद्युत डीपीचे स्थानांतरण करा
पवन मस्के यांची मागणी : उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन
भंडारा : बेला ते दवडीपार हद्दीतील नाल्यालगत असलेल्या, तसेच पावसाळ्यात पाण्याखाली येणाऱ्या व शेतकऱ्यांना जीविताला धोका असलेल्या त्या धोकादायक दोन्ही विद्युत डीपीचे दुसऱ्या जागेवर त्वरित स्थानांतरण करावे, अशी मागणी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
दवडीपार ते बेला रस्त्यावरील दवडीपार गावाच्या हद्दीतील रेल्वे पुलाजवळील नाल्यालगत असलेली विद्युत डीपी ही पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली येते. यामुळे ही डीपी शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. बेला ते दवडीपार रस्त्यावरील बेला गावाच्या हद्दीतील जुन्या पुलाजवळील डीपीसुद्धा धोकादायक असून या डीपीच्या बाजूचा खांब व आधारित असलेला खांब पूर्णपणे वाकलेला आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात थोडा जरी पाऊस आला तरी डीपीच्या आजूबाजूला पाणी जमा होते. यामुळे एखादी वेळी जर फ्युज गेला, तर पाण्यात जाण्यास कोणीही धजावत नाही. याबाबत वारंवार मुजबी येथील सहायक अभियंत्याला कळविण्यात आले. त्यांनी या ठिकाणी चौकशीही केली. मात्र, चौकशी करूनही व धोका ओळखूनही अद्यापही त्यांनी डीपीसाठी दुसरी जागा हस्तांतरित केली नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे येथील शेतकरी डीपीसाठी आपली जागा द्यायलाही तयार असताना वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या जीविताशी खेळण्याचा आहे. या डीपीवर अवलंबून असलेला बेला, दवडीपार, पिंडकेपार व कोंरभी येथील तब्बल १५० एकरचा शेतकरी वर्ग विद्युत विभागाच्या कारभारावर संतापला आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने हा शेतकरी खरीप हंगामाला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकलेले असून सद्य:स्थितीत पावसाने दडी मारल्याने आता खरी गरज विद्युतपंपाची असून शेतकऱ्यांना पऱ्हयांना पाणी देण्यासाठी विजेची खरी गरज असते. पिकाला पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या त्या दोन्ही डीपींचे तत्काळ स्थानांतरण करण्याची मागणी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष व भाजपचे सदस्य पवन मस्के यांनी केली आहे.
निवेदन देताना पवन मस्के, अशोक खोब्रागडे, लुकेश जोध, शेतकरी रविशंकर देवडीया, गौरीशंकर देवडीया, मुरलीधर बाभरे, लक्ष्मण बाभरे, नामदेव बांते, कमलबाई बेहरे, बाबूराव तुरस्कर, सीताराम पंचबुद्धे, हरेश्वर तितीरमारे, अनिल बाभरे, प्रमोद बघेले, जयदेव ठवकर, गंगाधर ठवकर, श्रीकृष्ण ठवकर, दादाराम गौरकर आदींसह बेला, दवडीपार, पिंडकेपार व कोरंभी येथील शेतकरी उपस्थित होते.
बाईट
बेला, दवडीपार रस्त्यावरील रेल्वे व जुन्या पुलाजवळील डीपीवर बेला, दवडीपार, पिंडकेपार व कोरंभी येथील दोन्ही डीपींवर जवळपास दीडशे एकरच्यांवर शेतकरी अवलंबून आहेत. या दोन्ही डीपी लवकरात लवकर बदलृून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच शेतकऱ्यांना शेतात येण्या-जाण्यासाठी जी पांदण आहे त्या पांदण रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
- पवन मस्के, अध्यक्ष, आदर्श युवा मंच, भंडारा.