रेल्वेची धडधड सुरु, पण प्रवाशांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:13+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत ७० दिवसांपासून रेल्वे प्रवासी वाहतूक बंद होती. दरम्यान काही श्रमीक रेल्वेगाड्या सुरु झाल्या. परंतु त्यांना ठराविक थांबे असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या इच्छूक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन २ जून पासून मुंबई हावडा मेल व हावडा अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरु झाल्या आहेत. त्यांना भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला.
तथागत मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : कोरोनामुळे ७० दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रेल्वेगाड्यांची धडधड सुरु झाली. सध्या दोन प्रवासी रेल्वे सुरु करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या या गाड्यांना भंडारा रोड येथे थांबा देण्यात आला. परिणामी प्रवाशांची रेलचेल सुरु झाली. काही महिन्यापूर्वीच हाऊसफुल्ल असणाऱ्या या रेल्वेस्थानकावर प्रवाशांची वानवा मात्र कायम आहे. मोजकेच प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि वैद्यकीय चमू येथे कुणीही दिसत नाही.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत ७० दिवसांपासून रेल्वे प्रवासी वाहतूक बंद होती. दरम्यान काही श्रमीक रेल्वेगाड्या सुरु झाल्या. परंतु त्यांना ठराविक थांबे असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या इच्छूक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन २ जून पासून मुंबई हावडा मेल व हावडा अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरु झाल्या आहेत. त्यांना भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला. दोन गाड्यांच्या चार फेऱ्या तात्पुरत्या सुरु करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात १३ प्रवाशी उतरले व १९ प्रवाशी पुढील प्रवासासाठी गेले.
रेल्वेगाड्या सुरु झाल्या असल्या तरी आंतरराज्य प्रवासाला बंदी आहे. विविध राज्यात अडकलेल्या प्रवाशांनाच सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील इतर भागातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना केवळ तिकीट मिळत आहे. रेल्वे अनेक दिवसांपासून बंद आहे. अनेकांनी तिकीट खरेदी केली होती. आता परताव्यासाठी अर्थात तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परतावा केंद्र सुरु असले तरी पाहिजे त्या प्रमाणात रोकड नसल्याने अनेकांना येरझारा माराव्या लागत आहेत. तीन दिवसात पाच लाख रुपये परत केल्याची माहिती देण्यात आली.
फिजीकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त आहे. तिकीट केंद्रावर कर्मचारी नेमून देण्यात आले आहेत. तिकीट विक्रीच्या ठिकाणी व रेल्वे फलाटावर फिजीकल डिस्टन्सिंगसाठी सीमा आखून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षितेकरिता आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती मुख्य वाणिज्यीक निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली. सुरक्षा व इतर कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असून नियमित सफाईवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.
प्रवाशांची आरोग्य तपासणी
सध्या प्रवाशांची तुरळक उपस्थिती आहे. मोजकेच प्रवाशी ये-जा करीत आहेत. या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग केली जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रेवनाथ गभणे प्रवाशांची तपासणी करीत आहेत. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.