तलाव खोलीकरणाची कामे लागणार मार्गी
By Admin | Updated: January 17, 2015 01:18 IST2015-01-17T01:18:29+5:302015-01-17T01:18:29+5:30
भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात तलावाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तलावातून मास्यांची शेती केली जाते.

तलाव खोलीकरणाची कामे लागणार मार्गी
साकोली : भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात तलावाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तलावातून मास्यांची शेती केली जाते. मात्र या तलावांचे खोलीकरण व गाळ काढणे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मासेमारी व शेती या दोन्हीवर याचा विपरित परिणाम पडला आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना याविषयाचे गांभाीर्य सांगितले असून तलाव खोलीकरण करणार असल्याचे आ.बाळा काशीवार यांनी सांगितले.
मागील कित्येक वर्षापासून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही व काही तलावांचे खोलीकरण करण्यात आले. शासन रस्ता किंवा ईमारत बांधते तेव्हा तिचा कालावधी ठरविते. मात्र तत्कालीन आघाडी शासनाने तलावांच्या दुरूस्तीकडे लक्ष दिले नाही.
पाळीची उंची वाढविणार
शेतीला सिंचन व मासेमारी व्यवसायासाठी तलावाचे खोलीकरण आवश्यक आहे. हे करताना तलावांच्या संपूर्ण क्षेत्रफळाची मोजणी करून हे तलाव दोन मीटर खोल करुन निघालेल्या मातीने पाळीची उंची वाढविण्यात येईल.
तलावातील अतिक्रमण काढू
शेतीलगतच्या तलाव परिसरात अतिक्रमण केल्यामुळे तलावाचे क्षेत्रफळ कमी झाले. त्यामुळेही तलावाची पाणी साठवणक्षमता कमी झाली. त्यामुळे तलावातील अतिक्रमण काढण्यात येईल.
तलाव मासेमारीसाठी उपयुक्त
भंडारा जिल्ह्यात तलावांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त आहे. या तलावातून शेतीला सिंचनाची सोय व याच तलावातून मत्स्यशेती केली जाते. या दोन्ही जिल्ह्यातील गोड पाण्यातील माशांना देशात मागणी आहे. मत्स्यशेतीची सोय व्हावी यासाठी तलावाची खोलीकरण व त्यात मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. शेतकरी व मासेमारी करणाऱ्या लोकांना याचा फायदा मिळून त्यांच्या आर्थिक उत्त्पन्नात भर पडेल.
(तालुका प्रतिनिधी)