लग्न कार्यातील हजारो किलो अन्न उकीरड्यावर
By Admin | Updated: January 8, 2015 22:49 IST2015-01-08T22:49:13+5:302015-01-08T22:49:13+5:30
सध्या शुभमंगल अर्थात लग्नसोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाले आहे. आनंदा-आनंदात लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र या शुभमंगलच्या माध्यमातून हजारो किलो अन्नाची नासाडी होताना दिसत आहे.

लग्न कार्यातील हजारो किलो अन्न उकीरड्यावर
खराशी : सध्या शुभमंगल अर्थात लग्नसोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाले आहे. आनंदा-आनंदात लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र या शुभमंगलच्या माध्यमातून हजारो किलो अन्नाची नासाडी होताना दिसत आहे.
लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमानेच लहान गावांमध्येही मंगलप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धतीच रूढ होताना दिसत आहे. या पद्धतीत अनेकजण भूक असो वा नसो ताटात भरपूर अन्न घेतात व नंतर खायला जड झाले की तसेच ताटात सोडून देतात. वर्षभऱ्याचा विचार करता साधारणत: लग्नाचे ३० ते ३५ मुहूर्त असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हजारो लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते आणि वाचलेले अन्न उकीरड्यावर फेकले जाते. त्यामुळे ही परिस्थिती विचित्र वाटत आहे.
एकीकडे गरीब व्यक्ती पोट भराव म्हणून दिवसभर आटा-पिटा करतो तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणात अन्न उकीरड्यावर टाकल जाते. सध्याची परिस्थिती बघता उदाहरणादाखल लग्नसोहळे ज्या मंगल कार्यालयात होतात तिथे मेजवानी आटोपल्यानंतरचे चित्र पाहिल्यास मंगल कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत मोठ्याप्रमाणात भात, भाजी व इतरही खाद्यपदार्थ फेकलेले दिसतात.
एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून लग्नकार्यात जेवणाच्या ताटीत २० टक्के अन्न उरलेले राहते व त्याची नासाडी होते, असा निष्कर्ष आहे. ताट वाहून घेण्याचा त्रास वाचावा यासाठी अनेकजण ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही जास्त अन्न वाहून घेतात प्रत्यक्षात ताटातील अर्ध्यापेक्षा जास्त अन्न वाया जाते. एका लग्नसमारंभात किसान १५० लोकांचे अन्न वाया जातो.
विशेष म्हणजे हेच अन्न बाहेर फेकल्यामुळे त्यातुन मिथेन या घातक वायूची निर्मिती होते ती ग्लोबल वॉर्मिंग तसेच वातावरणातील बदलास कारणीभूत ठरते.
एकीकडे कित्येक कुटूंब उपाशीपोटी झोपताना दिसतात तर दुसरीकडे हजारो किलो अन्न उकीरड्यावर फेकले जाते हे चित्र बंद होणे गरजेचे आहे. देशाचा विचार करता रोज ३० कोटी जनता उपाशी झोपते मग अशा परिस्थितीत लग्नातल्या अशा मेजवाण्या कितपत योग्य आहेत हा प्रश्न पडतो.
लग्नात भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाने हवे तेवढेच घेतल्यास अन्न वाया जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने शुभमंगल होईल. अन्न वाया न जाता प्रत्येकाच्या पोटात जावा कारण अन्न हे पुर्वब्रम्ह असे म्हटले जाते. (वार्ताहर)