तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे उपोषण मागे
By Admin | Updated: September 10, 2016 00:34 IST2016-09-10T00:34:07+5:302016-09-10T00:34:07+5:30
भंडारा येथे प्रस्तावित महिला व बाल रूग्णालयाच्या जमिनीच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजकुमार राऊत व सचिन घनमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे उपोषण मागे
भंडारा : भंडारा येथे प्रस्तावित महिला व बाल रूग्णालयाच्या जमिनीच्या मागणीसाठी काँग्रेसचे राजकुमार राऊत व सचिन घनमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी सदर जमिन अधिग्रहीत केलेल्या एका खाजगी कंपनीचा करार रद्द करून महिला रूग्णालयासाठी ५.५ एकर जमिन डिसेंबरपूर्वी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना सुजल निर्माण योजनेतून शहरातील नळयोजनेची जीर्ण पाईपलाईन बदलणे, दोन जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. मागण्यांचे निराकरण झाल्यानंतर उपोषण मंडपात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, जिल्हा प्रभारी प्रमोद गुडधे यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घनमारे व तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे, सीमा भुरे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रसन्न चकोले, अजय गडकरी व पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजप विदर्भ देणार नाही : वडेट्टीवार
जनतेची दिशाभूल करून वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर सत्ता मिळविणारे भाजप सरकार स्वतंत्र विदर्भ देणार नाही. विदर्भाच्या मुद्यावर राज्य सरकार अद्यापही गंभीर नाही. नागपूर येथील नाग नदीचे दूषित पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात येत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परंतु राज्य सरकारला जनतेची चिंता नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. भंडारा येथे स्थानिक मुद्यांना घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सोडविल्यानंतर आयोजित परिषदेत आमदार वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रस्ताव तत्कालीन काँग्रेस सरकारने आणला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षांपासून जागा उपलब्ध केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार डिसेंबरपर्यंत जागा उपलब्ध झाली नाही तर हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.