चोरट्यांच्या अफवेने धास्ती
By Admin | Updated: May 20, 2014 23:26 IST2014-05-20T23:26:03+5:302014-05-20T23:26:03+5:30
चोर-चोर, धावा-धावा असे वाक्य ग्रामीण भागात दररोज रात्रीला ऐकावयास मिळत असून संपूर्ण गाव चोरांच्या धास्तीने जागा राहात असतो. आज या गावात चोर आले होते,

चोरट्यांच्या अफवेने धास्ती
मोहाडी : चोर-चोर, धावा-धावा असे वाक्य ग्रामीण भागात दररोज रात्रीला ऐकावयास मिळत असून संपूर्ण गाव चोरांच्या धास्तीने जागा राहात असतो. आज या गावात चोर आले होते, काल त्या गावात चोर आले होते अशा अफवांना ऊत आलेला आहे. त्यामुळे यावर आवर घालणे आवश्यक झाले आहे. काही वर्षापूर्वी मोहाडी तालुक्यात अशीच स्थिती आली होती. आणि रात्रीला एखादा अनोळखी व्यक्ती गावात आला तर त्याची विचारपूस करण्याऐवजी त्याला बदडण्यात येत होते. चोरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बेटाळ्यात ४ व्यक्तींना, देव्हाड्यात २ व्यक्तींना, पालोर्यात एकाला कंठस्नान घातले होते. त्यांच्या मृत्युमुळे संपूर्ण तालुका ढवळून निघाला होता. ही परिस्थिती काही वर्षानंतर पुन्हा अनुभवाला येत आहे. आंधळगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या गावात तर सर्वात जास्त चोरांची लाट आल्याचे जाणवते. कान्हळगाव, टांगा येथे चोर आले होती अशी अफवा आहे. मोहाडीतही शेवटच्या टोकावर बांधलेल्या घराचे दार चोर ठोठावतात, अर्ध्या रात्री काही चोर फिरताना आढळले अशा चर्चा सुरू आहेत. आंध़ळगाव पोलिसांनी पाठलाग करुन दोन अट्टल चोरांना पकडले व त्यांच्या जवळून गावठी पिस्तुल व शस्त्रे जप्त केली अशाही चर्चा आहेत. मात्र या चर्चांना उधाण आल्यामुळे गावाबाहेर किंवा शेवटच्या टोकावर असलेल्या घरात राहणारे कुटुंब धास्तीत संपूर्ण रात्र काढत आहेत. पोलिसांनी या अफवांवर अंकुश लावण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी पोलिसानी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. अन्यथा चोरांच्या धास्तीने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हातून पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता फेटाळता येणार नाही. काही वर्षापूर्वी अशाच अफवेने त्रस्त झालेल्या नागरिकांनी बेटाळ्यात ४ चोरांची चांगलीच धुलाई केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. देव्हाड्यात सुद्धा दोन अनोळखी व्यक्तींंना चोर समजून मारहाण करण्यात आली होती तर पालोर्यात एका अनोळखी व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या दृष्टीने आता उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. (शहर प्रतिनिधी)