शेतकऱ्यांवर कदापी अन्याय होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:25+5:30
तालुक्यातील जांभळी (सडक) येथे मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद अध्यक्ष नाना पटोले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : कधी निसर्गाकडून तर कधी शासनाकडून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते. तरीही शेतकरी मोठ्या हिमतीने शेती करीत आहे. अशा शेतकऱ्यांना गरज आहे ती मार्गदर्शनाची. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. त्यामुळेच आमच्या सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असून शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
तालुक्यातील जांभळी (सडक) येथे मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद अध्यक्ष नाना पटोले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी सभापती पद्माकर गहाणे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, दीपक मेंढे, यशोदा कापगते, जासवंत कापगते, डॉ.वामन डोंगरवार, चुन्नीलाल वासनिक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनावर भर देण्यात येणार आहे. यातून शेतीला पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येईल. यावर्षी शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण झाली. मात्र ती अडचण लवकरच दूर करून शेतकऱ्यांचा संपूर्ण धान खरेदी करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शासनातर्फे जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी संकटाच्या वेळी धीर सोडू नये. हे सरकार शेतकरी हिताचे आहे. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, आदर्श शेतकरी, आदर्श शिक्षक, आदर्श महिला व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मार्तंडराव कापगते यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव होमराज कापगते यांनी संचालन अर्चना बावणे व रुपेश कापगते यांनी तर आभार प्रा.सहसराम बन्सोड यांनी मानले.