त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे
By Admin | Updated: June 24, 2015 01:03 IST2015-06-24T01:03:13+5:302015-06-24T01:03:13+5:30
निराधार, निराश्रित वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा, असे म्हटले जाते. वृद्धत्व आल्यावर मुलं आपले कर्तव्य विसरतात.

त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे
अनुदानापासून वंचित : मिटेवानी येथील वृद्धाश्रमाला लागली अखेरची घरघर
विलास बन्सोड उसर्रा
निराधार, निराश्रित वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा, असे म्हटले जाते. वृद्धत्व आल्यावर मुलं आपले कर्तव्य विसरतात. पण अशा वृद्धांसाठी शासनाने वृद्धाश्रम स्थापित केले. परंतु अनुदानाअभावी वृद्धाश्रमाला अखेरची घरघर लागली असून त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे.
तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथे असेच एक वृद्धाश्रम आहे जो अखेरची घटका मोजत आहे. वृद्धाप्रमाणे सदर वृद्धाश्रमही अनुदान नसल्यामुळे वृद्धाश्रम बंद होणार काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सन २००२ पासून मिटेवानी येथे दि सेल्फस्टंड रिव्होलुशन सोशल एज्युकेशन (फ्रन्ट) सोसायटी द्वारा संचालित लिलादेवी मातोश्री निराश्रीत वृद्धाश्रम सुरू आहे. सदर वृद्धाश्रम शासनमान्यता सुद्धा आहे. सन १९९१ च्या युती सरकारने मातोश्री वृद्धश्रम योजनानुसार अशा निराश्रीत वृद्धांसाठी मिटेवानी येथील वृद्धाश्रम सुरू करण्यात आले.
सदर वृद्धाश्रमात सुरूवातीला ५० च्या वर वृद्ध होते. पण कालांतराने ही संख्या कमी-कमी होत गेली. सध्या लिलादेवी मातोश्री निराश्रीत वृद्धाश्रमात १५ वृद्ध आश्रयास आहे. यात पुरूषांची संख्या सात तर महिलांची संख्या आठ आहे.
शासनाकडून अद्यापही अनुदान न मिळाल्याने स्वखर्चाने संचालक मंडळ सदर वृद्धाश्रम चालवित आहे. या सर्वाचे खर्च भागविताना त्यांची दमछाक होते. शिवाय सदर वृद्धाश्रमात कर्मचारी सुद्धा मोफत काम करत आहेत.
यात अधीक्षक, स्वयंपाकी, चपराशी, सहा वॉर्ड बाय असा येथील कर्मचाऱ्यांचा ताफा आहेत. आपल्याला शासनाकडून जरी वेतन मिळत नसले तरीही समाजभावनेतून आपण हे काम करीत असल्याचे मत सदर कर्मचारी विश्वासाने सांगतात. सध्या हे वृद्धाश्रम किरायाच्या घरात आहे. त्यांची स्वत:च्या मालकीची जागा नाही.
एवढे असूनही सदर वृद्धाश्रमातील वृद्ध मात्र घरच्यांची चिंता न करता आनंदाने राहतात. शासनाकडून समाजकल्याण विभागाचे अनेक मोठे अधिकारी वृद्धाश्रमाला भेट देवून गेलेत पण अद्यापही अनुदान मिळाले नाही. शासन अनेक कल्याणकारी योजना अमलात आणते पण अशा निराश्रीत वृद्धावर शासन केव्हा मेहरबान होणार हे सांगणे कठीण आहे.