लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साकोली तालुक्यातील विर्शी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतातच गळफास लावून मृत नोगेश मांढरे आत्महत्या केली. नोगेश शालिकराम मांढरे (४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना २८ मे (बुधवार) रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
नोगेश मांढरे यांची विर्शी शिवारात पावणेदोन एकर शेती आहे. आधीच अल्पभूधारक व त्यात आलेल्या नापिकीमुळे ते त्रस्त झाले होते. याशिवाय घराचे बांधकाम सुरू असल्याने ते मानसिक तणावात होते. मुलींचे शिक्षण व अन्य खर्च कसा भागवावा, या ते विवंचनेत होते. त्यांच्यावर विविध सेवा सहकारी संस्थेचे कर्ज आहे. नापिकी आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून नोगेश यांनी शेतातील मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
बुधवारला सकाळी ६ वाजता शेतात गेले होते. त्यांची आई व मुलगी शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, चार मुली व मोठा आप्त परिवार आहे. शासनाने मांढरे कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नोगेशचे वडीलही अंथरूणाला खिळूननोगेश मांढरे यांचे आईवडील वृद्ध आहेत. वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यापासून ते अंथरुणाला खिळून आहेत. मांढरे यांची मोठी मुलगी पदवीधर झाली असून अन्य बहिणी शिक्षण घेत आहेत. परिवारात नोगेश हेच एकमेव कमावते होते. शेतीच्या भरोशावरच त्यांचा प्रपंच सुरू होता. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वी घरकुलाच्या स्लॅबचे काम झाले होते. या घरकुलासाठी निधी अपुरा असल्याने ते विवंचनेत होते.