तंमुसच्या अध्यक्षपदापासून महिला कोसोदूर
By Admin | Updated: February 24, 2016 00:39 IST2016-02-24T00:39:42+5:302016-02-24T00:39:42+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर महिलांची वर्णी ग्रामसभेत लावण्यात आली नाही.

तंमुसच्या अध्यक्षपदापासून महिला कोसोदूर
ग्रामसभेत निवड नाही : सिहोरा परिसरात पदापासून महिला वंचित
चुल्हाड (सिहोरा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर महिलांची वर्णी ग्रामसभेत लावण्यात आली नाही. या सभेत निवड करण्यात येत नसल्याने महिला वंचित आहेत. सिहोरा परिसरातील ४७ गावात एकाही महिलेने अध्यक्ष पद भुषविले नाही असे दिसून येत आहे.
राज्यात आघाडी शासनाने गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महिला गांधी तंटामुक्त गाव योजना सुरु केली आहे. दिवंगत आर. आर. पाटील हे ग्राम विकास मंत्री असतांना त्यांनी विकासाची दोरी गावकऱ्यांचे हाती दिली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाने गावात स्वच्छतेची प्रेरणा दिली आहे. गावात आपुलकीची नाते, अखंडता व गावकऱ्यांचा वेळ तथा पैसा वाचविण्यासाठी २००७ वर्षात महात्मा गांधी तंटामुक्त गाव हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. गावातच तंटे निकाली काढण्यात येत असल्याने गावकऱ्यांचे विभक्त संबंध पुन्हा जोडण्याचे कार्य समिती मार्फत केली जात आहे. या समितीची निवड स्वातंत्र दिनी ग्रामसभेत केली जात आहे. विविध स्तरावर कार्य करणारे व्यक्ती, सेवा निवृत्त कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे नागरिक तथा अन्य नागरिकांचा या समितीत समावेश करण्यात येत आहे. महिलांचा समावेश अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे सदस्य, प्रतिष्ठित महिला यांची समितीत निवड करण्यात येत आहे. ग्राम सभेत समितीची निवड करण्यात येत असतांना अध्यक्ष पदावर निवड होण्याचा मान आजवर सिहोरा परिसरात एकाही महिलेला मिळाला नाही. विविध क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. अधिकार व हक्कासाठी महिला भांडताना दिसत आहे. नेतृत्व करण्याची क्षमता महिलामध्ये आहे. शासकिय व निमशासकीय, राजकारण सामाजिक क्षेत्रात महिला अग्रणी भुमिका बजावत आहेत. ७ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये ४ महिला सत्ताधारी झालेल्या आहेत.
गावात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी महिला महत्वाची भुमिका बजावत आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला एक संघ निर्माण करीत असतांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर २००७ पासून महिलांची सिहोरा परिसरात निवड करण्यात आली नाही.
या पदावर वर्णी लागण्याचा पहीला बहुमान एकाही महिलेला प्राप्त झाला नाही. गावात आता पोलीस पाटील पदाची धुरा महिला सांभाळत आहे. गावच सरपंच पद भुषवून गावात विकासाची लाट या महिला नेतृत्वानी आणली आहे. अन्याय व अत्याचार विरोधात कायद्याचे चौकटीत राहून महिला लढा देत आहे. गावातील उध्वस्त संसार पुर्ववत आणण्यासाठी महिला प्रयत्न करीत आहेत. पंरतु तमुसचे अध्यक्ष पद या महिला पासून कोसो दुर ठेवण्यात आले आहे. या पदावर एकाही महिलेची वर्णी लागली नसल्याने वंचित आहेत. (वार्ताहर)
ग्रामसभेत तमुसच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाल्यास महिलांचे मनोबल उंचावेल, पर्यायाने महिलात जागृकता आणता येईल.
- प्रेरणा तुरकर, सदस्य जि.प. बपेरा क्षेत्र
ग्रामसभेला सर्वाधिकार प्राप्त आहेत. या सभेत तंमुसच्या अध्यक्षपदी महिलेची निवड गावकऱ्यांनी करायला पाहिजे.
- विमल कानतोडे, सदस्य पं.स. खापा क्षेत्र
गाव विकासात महिलांची भुमिका महत्वपूर्ण आहे. यामुळे तमुसचे अध्यक्ष पद सर्व समंतीने महिलांना दिल्यास महिलामध्ये जागृकता आणता येईल.
- नेहा पटले, अध्यक्ष महिला मंडळ चुल्हाड