तेंदूपाने संकलनकर्त्यांना वन्यप्राण्यांपासून धोका
By Admin | Updated: May 11, 2014 23:11 IST2014-05-11T23:11:40+5:302014-05-11T23:11:40+5:30
रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. त्यामुळे अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजना

तेंदूपाने संकलनकर्त्यांना वन्यप्राण्यांपासून धोका
गोसे (बुज़) : रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. त्यामुळे अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजना कागदोपत्री असल्यामुळे दररोजचा प्रपंच चालविण्यासाठी उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनातून अनेक बेरोजगार हातांना रोजगार मिळाला आहे. मात्र तेंदुपत्ता गोळा करताना या मजुरांना वन्यप्राण्यांपासून मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मजुरांना विमा संरक्षण नसल्यामुळे काही घटना घडल्यास त्यांचे कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मजुरांना विमा संरक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक पर्यायी रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलनाकडे पाहतात. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील घराघरांत लहानापासून वृद्धांपर्यंत संपूर्ण कुटुंब या व्यवसायात गुंतलेले असतात. अगदी पहाटे जंगलात जाऊन वन्यप्राण्यांशी सामना करीत तेंदुपत्ता गोळा करतात. परंतु त्यांना मिळत असलेल्या अल्प मोबदल्यात आपला जीव धोक्यात घालीत असल्यामुळे त्यांच्या हाती धुपाटणे मिळत आहे. पवनी तालुक्यात असलेल्या विस्तीर्ण, घनदाट जंगलातून हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या व्यवसायातून ठेकेदार व मालक मालदार झाले आहेत. तर मजूर मात्र अल्प उत्पन्नातून केविलवाणे जीवन जगण्याकरिता धडपड करीत आहेत. तेंदूपत्ता संकलन करणार्या मजुरांचे शोषण मात्र संपलेले नाही. या तालुक्यात अनेक वर्षापासून तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय अविरत सुरू आहे. यासाठी प्रत्येक वन कार्यालयात तेंदुपत्ता संकलन विभाग असतो. तेंदुपत्ता संकलनाला मे महिन्यात सुरुवात होत असते. १५ ते २० दिवसाचा हा हंगाम असतो. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी तेंदुपत्ता युनिटच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येते. त्यानंतर लिलाव होतो. त्यानंतर जंगलामध्ये बालमजुरांना घेऊन तेंदुपत्ता झाडाचे खुटकटाईचे काम केल्या जाते. मे महिन्यामध्ये प्रत्यक्ष तेंदुपत्ता संकलनाला सुरुवात केले जाते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतात राब राब राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर उन्हात तेंदुपत्ता तोडायचे कामात स्वत:ला गुंतवून चार पैसे मिळवायचे असा नित्यक्रमच ठरला आहे. उन्हाळ्यात हाताला दुसरे काम नसल्यामुळे चार पैसे हातात मिळावे म्हणून जिवाचे रान केले जाते. अनेक वर्षापासून अगदी पिढीजात हे मजुरीचे काम करणार्यांची आर्थिक स्थिती अगदी बेताची असते. (वार्ताहर)