शिक्षकांना ‘आदर्श’ पुरस्काराचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 00:28 IST2016-09-07T00:28:27+5:302016-09-07T00:28:27+5:30
देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘आदर्श’ शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

शिक्षकांना ‘आदर्श’ पुरस्काराचा ठेंगा
शिक्षकांमध्ये असंतोष : जिल्हा परिषद अध्यक्षांनी रद्द केला कार्यक्रम
भंडारा : देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘आदर्श’ शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद भंडाराच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील नऊ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केली. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षांनी ऐन वेळेवर हा कार्यक्रम रद्द केला. यामुळे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहावे लागण्याचा संतापजनक प्रकार आज घडला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण तथा शहरी भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मुख्य कार्यक्रम शिक्षक करतात. अशा शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन दरवर्षाला शिक्षकांचा गुणगौरव करण्यात येतो. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील नऊ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली.
जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत या समितीने २९ आॅगस्टला आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड करून यादी तयार केली. कार्यक्रमाचे नियोजन करून ५ सप्टेंबर ऐवजी ६ सप्टेंबरला दुपारी १ वाजता कार्यक्रम घेण्याचे ठरविले. त्यानुसार निमंत्रण पत्रिका छापून त्या मान्यवरांना वितरीत करण्यात आले. आज जिल्ह्यातील ९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करायचे होते. मात्र ऐन वेळेवर जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी क्षुल्लकशी तांत्रिक बाब पुढे करून हा पुरस्कार सोहळा रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. अध्यक्षांच्या आदेशाची अंमलबजावणी करून शिक्षकांना व कार्यक्रमाच्या मान्यवरांना माहिती देण्यात आली. ही माहिती प्राप्त होताच जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. आदर्श शिक्षकांच्या पुरस्काराच्या निवडीसाठी तयार होणाऱ्या यादीदरम्यान राजकारण होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला.अनेक शिक्षक या पुरस्कारप्राप्तीसाठी प्रस्ताव सादर करीत नसल्याचीही गंभीर बाब आता समोर आली आहे. पुरस्कार कार्यक्रम रद्द झाल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. (शहर प्रतिनिधी)
सन २०१६-१७ या वर्षाच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील शिक्षकांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. यात ११ शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले. सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्र, शैक्षणिक कार्य या सर्व कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली.
जिल्हा निवड समितीत यांचा समावेश
जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्यांमध्ये शिक्षण सभापती, समाजकल्याण सभापती, महिला व बालविकास सभापती, डी.टी.एड. चे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्य.) आणि सदस्य सचिव महणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोणत्या शिक्षकांना यावर्षीचा जिल्हा आदर्श पुरस्कार देण्यात येणार आहे, याची माहिती एका शिक्षकाने माहितीच्या अधिकारांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मागितलीे आहे. परंतु सध्या तरी ही माहिती देण्यात आली नाही, यावरही खमंग चर्चा सुरू झाली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करण्यासाठी झालेली सभा ही उशिरा झाली. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नव्हते. जी यादी बनविण्यात आली त्यावर त्यांची स्वाक्षरी नाही. ज्या शिक्षकांची निवड झाली नाही अशातील एकाने माहिती अधिकारातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती मागितली आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठता व नियमानुसार सर्वांना पुरस्कार मिळाला पाहिजे. हा मुद्दा समोर आला. कुठल्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. शिक्षण विभागाला या बाबत माहिती देण्यात आली होती. त्यांनी घाईघाईने नियोजन करून कार्यक्रम घोषित केला. मात्र याबाबत बैठक घेऊन सर्व शिक्षकांना येत्या कालावधीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- भाग्यश्री गिलोरकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा.
निवड समितीने आदर्श शिक्षकांची निवड केली. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. कार्यक्रम रद्द करण्याबाबत कुठली अडचण आली त्याबाबत कल्पना नाही. कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादीची आग्रही भूमिका आहे.
- राजेश डोंगरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा
काही अपरिहार्य कार्याने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला. या संदर्भात बैठक घेऊन पुढील तारीख लवकरच घोषित करण्यात येईल व पुरस्कार विजेत्या सर्व शिक्षकांना गौरविण्यात येईल.
- सुवर्णलता घोडेस्वार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
मागील दशकभरापासून जिल्हा परिषदेमार्फत सत्कार केला जात आहे. अध्यक्षांना याबाबत सर्वस्वी अधिकार बहाल करण्यात आले आहे. यावर्षी ही परंपरा मोडीत काढण्यात आली. हा शिक्षकांचा एक प्रकारे अवमान आहे. बीड जिल्ह्ह्यात ठरलेल्या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबरला कार्यक्रम घेण्यात आला, मग भंडारा जिल्ह्यात समारंभ का घेण्यात आला नाही. सर्वत्र पत्रिकाही वाटण्यात आल्या. हा गंभीर प्रकार असून याला सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार आहे.
- रमेश सिंगनजुडे, अध्यक्ष, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कार्यक्रमाची केलेली आखणी नियोजनशून्य आहे. यात शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा समोर आला. ऐन वेळेवर कार्यक्रम रद्द करून शिक्षकांची थट्टा करण्याचा हा प्रकार संतापजनक आहे.
- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र. राज्य. प्राथ. शिक्षक. संघ.भंडारा