अन्यायकारी सरकारला धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:11+5:302021-02-05T08:39:11+5:30
विविध मागण्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्यावतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढण्यात आला. यावेळी त्रिमूर्ती चाैकात झालेल्या सभेत फडणवीस ...

अन्यायकारी सरकारला धडा शिकवा
विविध मागण्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्यावतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढण्यात आला. यावेळी त्रिमूर्ती चाैकात झालेल्या सभेत फडणवीस बाेलत हाेते. यावेळी मंचावर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, आमदार डाॅ. परिणय फुके, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, ॲड. रामचंद्र अवसरे, संजय पुराम, माे. तारीक कुरेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, प्रदीप पडाेळे, श्याम झिंगरे, उपेंद्र काेठेकर, मुकेश थानथराटे, संजय कुंभलकर, आशु गाेंडाणे, रुबी चढ्ढा, दिनेश भुरे आदी उपस्थित हाेते.
फडणवीस म्हणाले, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे दाेन वर्षांपासून थकीत चुकारे मिळाले नाही. धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार हाेत असून त्याला विद्यमान शासन खतपाणी घालत आहे. काेराेना काळातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचे सूताेवाच करणारे शासन आपल्याच शब्दातून माघारी फिरले आहेत. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कुठल्याही कर्जमाफीचा व प्राेत्साहन निधीचा लाभ मिळाला नाही. घरकूल याेजनेचा बाेजवारा उडाला असून अशा अन्यायकारक शासनाला जाब विचारण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याप्रसंगी खासदार सुनील मेंढे म्हणाले, राज्यसरकार अनेक बाबतीत सपेशल फेल ठरले आहे. शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक अडचणीत सापडले आहे. अशावेळी मदतीचा हात देण्यापेक्षा वीजपुरवठा खंडित करण्याचा अफलातून आदेश काढणाऱ्या शासनाला जनसामान्यांची फिकीर नाही असेच वाटते. याप्रसंगी माजी आमदार चरण वाघमारे, शिशुपाल पटले यांच्यासह अन्य मंडळीनी मार्गदर्शन केले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी संदीप कदम यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार परिणय फुके यांच्यासह खासदार सुनील मेंढे, शिशुपाल पटले, चरण वाघमारे, बाळा काशिवार, तारीक कुरैशी, मुकेश थानथराटे, प्रदीप पडाेळे, संजय कुंभलकर आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स
गरिबांचे हाल बेहाल - परिणय फुके
राज्यातील आघाडी सरकारने शेतमजूर, शेतकरी व जनसामान्यांना अनेक बाबतीत वेठीस धरण्याचा विडा उचलल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या धानाचे चुकारे अजूनही मिळाले नाही. घरकूल लाभार्थ्यांना लाभ मिळत नसून आवास याेजनेचा लाभासाठी ते तरसत आहेत. याशिवाय काेराेना काळातील वीज बिल माफी, पूरग्रस्तांना मदत, घरकूल याेजनेचा लाभ मिळाला नाही, असे आमदार डाॅ. परिणय फुके यांनी सांगितले.