‘त्या’ प्रकरणात ठाणेदाराला निलंबित करा
By Admin | Updated: May 1, 2016 00:22 IST2016-05-01T00:22:12+5:302016-05-01T00:22:12+5:30
कान्हळगाव /सिरसोली येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर तरुणीला मारहाण झाली.

‘त्या’ प्रकरणात ठाणेदाराला निलंबित करा
आरोपीला अटक करा : आंदोलनाचा इशारा, पत्रकार परिषदेत ग्रामस्थांची मागणी
मोहाडी : कान्हळगाव /सिरसोली येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर तरुणीला मारहाण झाली. त्या प्रकरणात आंधळगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने निष्काळजीपणा दाखवून आरोपीला सोडण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ठाणेदाराला निलंबित करण्यात यावे व आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी केली. दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.
कान्हळगाव / सिरसोली येथे रोजगार हमी योजनेच्या पांदण रस्त्यावर तरुणीला मारहाण झाली. तरुणी बेशुद्ध झाली. सर्वासमक्ष तरुणीची चर्चा चव्हाट्यावर मांडण्यात आली. तरी आंधळगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून आरोपी चामट व त्याचा भाऊ याला मोकाट सोडून देण्यात आले. एवढेच नाही तर आरोपीने घटनेच्या दिवशी फिर्यादीच्या घरावर हल्ला चढविला. मारण्याची धमकी दिली. असे घडले असताना पोलिसांनी दखल घेतली नाही. एवढेच नाही तर घटनास्थळावरचा पंचनामा केला नाही. उपस्थित मजुरांचे बयाण घेतले नाही. पोलिसांच्या निष्काळजीमुळे कान्हळगावात पोलिसांविरुद्ध संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आरोपीचा भाऊ गावात बेबंदशाहीने वागून माझे कुणी बिघडवू शकत नाही असे बोलत आहे. गुन्हेगारीला लगाम देण्याचे काम करण्याऐवजी आरोपींना पाठबळ देण्याचे काम पोलीस करीत असल्याची भावना निर्माण गावकऱ्यांमध्ये झाली आहे. या घटनेची कैफियत मांडण्यासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला सरपंच मेघा उटाणे, माजी सरपंच अनुप उटाने, ग्रा.पं. सदस्य चंद्रशेखर कस्तुरे, रक्षा बागडे, प्रा.डॉ.सुनील चवळे, सिनेट सदस्य नीतेश फुलेकर, मुलीचे वडील यशवंत चवळे, नर्बद कस्तुरे, गीता उटाणे, मोहन वहिले, विशाखा मेश्राम, छत्रपती चवळे, सुखचंद सुखदेवे, नंदा मेश्राम, अनिता निमकर, सतीश इटनकर आदी बरेच महिला, पुरुष उपस्थित होते. गावात तरुणीचा अब्रू लुटणाऱ्या तरुणाला धडा शिकविलाच पाहिजे ही मागणी महिलांनी केली. या प्रकरणात आंधळगाव पोलिसांनी फुकटचा सल्ला देण्यापेक्षा आपले नीटपणे कर्तव्य बजावले पाहिजे होते असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. या घटनेसंबंधी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डी.आय.जी. नागपूर, पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी पवनीत कौर, तहसीलदार मोहाडी यांना निवेदन सादर केले होते. तसेच त्यानंतर २७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्याशी पीडित मुलगी, तिचे वडील, सरपंच मेघा उटाणे व काही ग्रामस्थ भेटायला गेले होते. यावेळी पोलीस अधीक्षकांनी केवळ पीडित मुलगी व सरपंच यांनाच चर्चेसाठी आत बोलावले. पीडित मुलीकडून घटनेची हकीकत जाणून घेतली. कारवाईचे आश्वासन दिले. मात्र चार दिवस लोटूनही कोणतीच कारवाई पोलिसांनी केली नाही. त्यामुळे गावात पत्रकार परिषद घेवून गावकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले तसेच पत्रकार परिषदेत दिनांक ४ मे पर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाही तर ५ मे रोजी तहसील कार्यालय मोहाडी पोलीस स्टेशन आंधळगाव यांच्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोर्चा व मागण्यांचे निवेदन पुन्हा पोलीस अधीक्षक भंडारा, पोलीस स्टेशन आंधळगाव, उपविभागीय अधिकारी पवनीत कौर, तहसीलदार मोहाडी यांना देण्यात आले आहे.
(तालुका प्रतिनिधी)