सुभाषने फुलविली वांग्याची शेती
By Admin | Updated: December 8, 2015 00:35 IST2015-12-08T00:35:56+5:302015-12-08T00:35:56+5:30
एकीकडे रोजगाराच्या संधी नाहीत अशी ओरड आहे. परंतु जिद्द, परिश्रमाच्या भरवशावर तामसवाडी (सिहोरा) येथे सुभाष निशाने या युवकाने भाड्याने घेतलेल्या...

सुभाषने फुलविली वांग्याची शेती
लोकमत शुभवर्तमान : जिद्द व परिश्रमाचे फलित, वार्षिक सात ते आठ लाखांचे उत्पादन
मोहन भोयर तुमसर
एकीकडे रोजगाराच्या संधी नाहीत अशी ओरड आहे. परंतु जिद्द, परिश्रमाच्या भरवशावर तामसवाडी (सिहोरा) येथे सुभाष निशाने या युवकाने भाड्याने घेतलेल्या १० एकर शेतात एका हंगामात सात लाखांची वांगी उत्पादन करण्याचा संकल्प केला आहे. ही वांगी मध्यप्रदेशातील बालाघाट व गोंदिया येथे विक्रीकरिता जात आहे. तिथे या वांग्याला प्रचंड मागणी आहे.
सिंचनाची ओरड, बेरोजगारीची समस्या असताना रेंगेपार (पांजरा) येथील मॅट्रीक उत्तीर्ण सुभाष निशाने (३०) याने आपल्या जिद्दीवर परिश्रमाने १० एकरात वांग्याची शेत फुलविली आहे. याकरिता तामसवाडी (सि.) येथे वैनगंगा नदी काठावर त्यांनी बंडू काळे यांचेकडून १० एकर शेती सात वर्षाकरिता भाडे तत्वावर घेतली. सात वर्षात त्यांना काळे यांना सात लक्ष द्यावयाचे आहे. सुभाष यांची स्वत:ची शेती रेंगेपार (पांजरा) येथे आहे. तिथे त्यांनी सुमारे २० एकरात ऊस पीक लावले. ऊस पीक लावल्यानंतर रिकाम्या वेळात बागायती शेती करावी असे वाटले. त्याकरिता त्यांनी बागायती शेतीचा शोध घेतला. तामसवाडी येथे १४ एकर बागायती शेती मिळाली. पर्यावरणात बदलामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वांगी लावली तर होईल काय ही भीती सदैव मनात होती. परंतु डर के आगे जीत है. हे त्यांनी सार्थक करून दाखविले.
१० एकरातील वांग्याला सुमारे चार ते साडेचार लक्ष खर्च आला. आतापर्यंत २४ ते २५ फवारण्या केल्या. एका फवारणीकरिता २२ हजारांचा खर्च त्यांना आला. वांग्याला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी द्यावे लागते. त्याकरिता शेतावर विहिर आहे. आतापर्यंत २ लक्ष ३५ हजाराची औषधीला खर्च आला.
आठ दिवसातून एकदा वांगी तोडली जातात. याकरिता ३० ते ३२ महिलांना रोजगार प्राप्त होतो. आॅक्टोबर महिन्यापासून येथे वांग्याचे उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला ३० रुपये किलोग्रॅम एवढा भाव होता. सध्या १५ रुपये किलोग्रॅम भाव सुरु आहे. यावर्षी वांग्याला मोठ्या प्रमाणात कीड लागली. त्याकरिता औषधी फवारणीवर मोठा खर्च करावा लागला असे सुभाषने सांगितले. कृषी विभागाने मार्गदर्शन लाभत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनेच शेती करणे सुरु आहे. फळबाग (बागायती) शेती वर्षातून सहा ते सात महिनेच केली जाते. वांगी पीक घेतल्यावर शेतीची मशागत करण्यात येते. तीन ते चार महिने हे पीक घेतले जाते.
येथील वांगी परप्रांतात मध्यप्रदेशातील बालाघाट व महाराष्ट्रातील गोंदिया शहरात विक्रीकरिता पाठविले जातात. तिथे भाव जास्त असून रक्कम त्वरीत मिळते असे सुभाष यांनी सांगितले. तुमसर शहरात दलाली जास्त असल्याने येथे वांगी विक्री करीत नाही असे आवर्जून सांगितले. रुचकर, स्वादिष्ट वांगी तुमसरकरांना मिळत नाही याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. कृषी विभागाच्या ढिगभर योजना व ढिगभर कर्मचारी व अधिकारी आहेत. परंतु या युवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही.