‘त्या’ बांधकामाची उपअभियंत्यांकडून चौकशी सुरू
By Admin | Updated: June 3, 2016 00:40 IST2016-06-03T00:40:11+5:302016-06-03T00:40:11+5:30
बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर - चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत

‘त्या’ बांधकामाची उपअभियंत्यांकडून चौकशी सुरू
दखल ‘लोकमत’ची : प्रकरण बावनथडी प्रकल्पातील कामाचे
विलास बन्सोड उसर्रा
बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर - चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची दैनिक ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच बावनथडी प्रकल्पाचे उपअभियंत्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी सुरु केली आहे.
वन्यप्राण्यांना ये जा करण्यासाठी मुख्य कालव्यावर पुल बांधकाम करण्यात येत आहे. सदर पुलाचे बांधकाम गोंदिया येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले. सदर कंत्राटदार हा प्रकल्पातील काही अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने निकृष्ट साहित्याचा वापर करून पुलाचे बांधकाम सुरु आहे. यात कमी दर्जाच्या लोखंडाचा उपयोग करीत आहे. सिमेंट अल्प प्रमाणात घालत असून बांधकामावर पाणी टाकत नसल्याने कामाचा दर्जा पूर्णत: निकृष्ट झाला आहे, अशी तक्रार होती. विशेष म्हणजे नाल्यातील वाळूचा अवैधपणे चोरटी वाळूचा उपयोग सदर बांधकामात केला जात आहे.
सदर बांधकाम बावनथडी धरणाच्या मुख्य कालव्यावर अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेसूर व चिखली भागात बांधकाम सुरु आहे.
या जंगलात कुणीही ये जा करत नसल्याने याचाच कंत्राटदाराने फायदा घेत निकृष्ट बांधकाम करत आहे. यासाठी बावनथडी प्रकल्पातील कनिष्ठ अभियंता यांच्या संगनमताने सदर निकृष्ट काम होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. वृत्त प्रकाशित होताच संबंधित विभागाला जाग आली.
बावनथडी प्रकल्पातील तुमसर येथील उपअभियंता यांनी याकडे लक्ष देवून तात्काळ चौकशी सुरु होणार असे सदर प्रतिनिधीस सांगितले. चौकशीअंती काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कंत्राटदारांचे धाबे दणाणले
लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच उपअभियंत्यांनी चौकशी सुरु केली असून कंत्राटदार व यात समाविष्ट कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे. प्रकरण दाबण्यासाठी सावरासावर होत असल्याची माहिती आहे. प्रकरण अंगलट येईल म्हणून बांधकाम करणारे कंत्राटदार व कर्मचारी लॉबिंग करीत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. सध्या मुख्य कालव्यावर अन्य कंत्राटदारांची कामे सुरु आहेत. यात आउटलेट, व्ही.आर.बी., पुल व कालवे आदी कामे सुरु असून बाकी सर्व कंत्राटदारांनाही याचा फटका बसू शकतो, यात काही शंका नाही. आधीच बावनथडी प्रकल्पात अंदाजपत्रकाच्या किमतीपेक्षा कंत्राटदारांनी कमी दरानी कामे घेतल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामाचा दर्जा कमकुवत झाला आहे.