बससाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते विद्यार्थ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:31+5:30
भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात येणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतात.

बससाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते विद्यार्थ्यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ग्रामीण विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसेसमधून येत असतात. परंतु, संध्याकाळी परत जाताना बहुतांश थांब्यावर बसेस थांबत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत थांब्यावरच ताटकळत असतात. एसटी विभागाच्या हेकेखोरपणामुळे ग्रामीण विद्यार्थी रात्री उशिरा आपल्या गावी पोहोचतात. हा प्रकार दररोजचाच झाला असून आमचा हा छळ कधी थांबणार, असा प्रश्न संतप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
भंडारा शहरात विविध गावातील हजारो विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यांना येण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलतीची पास उपलब्ध करुन दिली जाते. सकाळसत्रात येणारे विद्यार्थी दुपारपर्यंत गावी जातात. परंतु, दुपारसत्रात येणारे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतात. याचे कारण जाणून घेण्यासाठी शहरातील काही बस थांब्याची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होणारा धक्कादायक प्रकार पुढे आला.
भंडारा मुख्य बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसना जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक, शास्त्री चौक, आयटीआय टाकळी याठिकाणी थांबा देण्यात आला आहे. या थांब्यावर संध्याकाळी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी झालेली असते. बस येताच सर्व विद्यार्थी बसकडे धाव घेतात. अनेकदा बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने बसचालक थांब्यावर बस न थांबविता पुढे निघून जातात. तर विद्यार्थ्यांकडे पास असल्याने बस वाहक त्यांना बसमध्ये घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसºया बसची वाट पाहावी लागते. दुसरी बस येताच पुन्हा तोच प्रकार घडतो. असे करताना अंधार होऊनही विद्यार्थ्यांना बस मिळत नाही. एसटी महामंडळाच्या नियोजनशून्यतेचा फटका हजारो विद्यार्थ्यांना दररोज सहन करावा लागत आहे. रात्र होऊनही विद्यार्थी घरी पोहोचत नसल्याने त्यांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकत असतो. हा आमचा छळ आहे. एसटी विभागाने व लोकप्रतिनिधींनी आमच्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करावी, अशी एकच मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
बसेसची सोय करा, अन्यथा आंदोलन
आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचतात काय? यावर संबंधित शाळा प्रशासन कधीच लक्ष देत नाहीत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची जबाबदारी आमची नाही, अशीच भूमिका अनेक शाळांनी घेतली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाच्या या बेबंदशाहीबाबत त्यांना एकाही शाळेने जाब विचारला नाही. दरम्यान, सदर विद्यार्थ्यांसाठी पर्यायी बसेसची सोय करण्यात यावी, अशी मागणी विभाग नियंत्रकांकडे यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. परंतु, त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, समस्येत वाढ होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्याय एसटी बसेसची सोय करण्यात यावी, अन्यथा एसटी महामंडळाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक बंटी मिश्रा यांनी दिला आहे.