विद्यार्थीच राष्ट्र निर्माण करू शकतात
By Admin | Updated: January 3, 2015 00:42 IST2015-01-03T00:42:32+5:302015-01-03T00:42:32+5:30
विद्यार्थी जीवनात झालेले संस्कारच पुढे आयुष्य घडवण्यास उपयोगी ठरतात. शिक्षणासोबतच सुसंस्कृतपणा अंगी यायला हवा. शालेय शिक्षणामधूनच व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे,...

विद्यार्थीच राष्ट्र निर्माण करू शकतात
साकोली : विद्यार्थी जीवनात झालेले संस्कारच पुढे आयुष्य घडवण्यास उपयोगी ठरतात. शिक्षणासोबतच सुसंस्कृतपणा अंगी यायला हवा. शालेय शिक्षणामधूनच व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश काशीवार यांनी केले. जिल्हा परिषद हायस्कूल, साकोलीच्या द्विदिवसीय वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती श्रावण बोरकर हे होते. अतिथी म्हणून शाळा समिती अध्यक्षा गीता कापगते यांनी वार्षिकोत्सव कार्यक्रमातून वक्तृत्व व नेतृत्व गुण वाढीला लागतील. आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर तर झाला पाहिजे, पण त्यातून माणूसपणही जोपासले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. अॅड. दिलीप कातोरे म्हणाले, परीक्षेत पास होेणे महत्वाचे नाही तर जीवनाच्या परीक्षेत पास होण्यासाठी सर्वांगिण प्रगती महत्वाची आहे. शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार, श्याम शिवणकर यांनी शाळेत सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची प्रशंसा केली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या जया भुरे, शिक्षक पालक संघाचे कैलास गेडाम व बबिता भजे उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली, उच्च श्रेणी खंड विकास अधिकारी व्ही.टी. बोरकर, गटशिक्षणाधिकारी जी.के. फटिंग, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बावणकुळे, लक्ष्मीनारायण विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरूषोत्तम गुंगमोडे, माजी मुख्याध्यापक सलीम अन्सारी यांचे उपस्थितीत पार पडला. संचालन अशोक रंगारी यांनी तर आभारप्रदर्शन अरुण पारधी व उमेश चोले यांनी केले.
कार्यक्रमासाठी शिक्षक पारधी, भानारकर, चोले, मोहबंशी, अतकरी, भानारकर, खोब्रागडे, येडे, लंजे, खोब्रागडे, जनबंधू यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)