लाखांदुरात वादळाचा तडाखा
By Admin | Updated: April 9, 2015 00:36 IST2015-04-09T00:36:57+5:302015-04-09T00:36:57+5:30
मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व वादळाच्या तडाख्याने कवेलू घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झाले

लाखांदुरात वादळाचा तडाखा
आंब्यांचे नुकसान : कवेलूंच्या घरांची नासधूस, आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी
लाखांदूर : मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व वादळाच्या तडाख्याने कवेलू घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झाले भाजीपाला व आंब्यांच्या झाउांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होवून फळबाग धारकांना जबर फटका बसला. बाजार समितीतील उघड्यावर पडलेले कडधान्य पाण्यात भिजल्याने कवडीमोल भावात लिलाव होण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली.
लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या वतीने फलोत्पादन योजना स्विकारून धान शेतीला बगल देत आंबा, केळ, बाग फुलवली. काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिक घेवून उदरनिर्वाहाचे साधन निवडले. नगद पीक म्हणून सेवा सहकारी सोसायटीमधून कर्ज घेतले. ऐन पिक हातात येण्याची वेळ असताना काल अचानक जोरदार वादळासह पाऊस पडला. याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही बसला. अनेक मार्गावरील, शेतातील झाडे उन्मळून पडली. भरभरवित झालेले आंबे पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. कवेलूचे घर असलेले सर्वसामान्य कुटूंब उघड्यावर आले. छोटे उद्योगधंदे करणाऱ्यांच्या डोक्यावरचे छत उडाले. येथील बाजार समितीच्या आवारात योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी आणून टाकलेले कडधान्य उघड्यावर पावसात भिजले. काही शेतकऱ्यांनी स्वत: ताडपत्री झाकण्याचा प्रयत्नही केला मात्र सुसाट वादळाने काही एक ऐकले नाही अखेर उभे पीक पाण्यात भिजल्याने योग्य भाव मिळणार असून शेतकऱ्याची चिंता वाढली. कृषी विभागाने नुकसान भागाची पाहणी करून आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली. (तालुका प्रतिनिधी)