भंडाऱ्यात संतप्त ट्रक मालकांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:30 IST2016-09-08T00:30:48+5:302016-09-08T00:30:48+5:30
रेतीची वाहतूक करीत असताना दिलीप रोहणकर (४६) या ट्रकचालकाचा ट्रकखाली दबून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

भंडाऱ्यात संतप्त ट्रक मालकांचा रास्ता रोको
प्रकरण ट्रकचालकाच्या मृत्यूचे : लाखांदूर पोलीस ठाण्यासमोर ट्रकचालक-मालक संघटनेची निदर्शने
भंडारा : रेतीची वाहतूक करीत असताना दिलीप रोहणकर (४६) या ट्रकचालकाचा ट्रकखाली दबून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर संतप्त ट्रकचालक-मालकांनी दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या मागणीला घेऊन भंडारा येथे बुधवारला दुपारी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. दरम्यान, संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. याप्रकरणी ३१ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लाखांदूर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांच्याकडे लाखांदूर व विरली (बुज) क्षेत्रातील रेती घाटांच्या चौकशीचे अधिकार देण्यात आले. ६ सप्टेंबरला रात्री ८ वाजताच्या दरम्यान मोहरना, नांदेड, ईटान, गवराळा या क्षेत्रामधील अन्य रेतीघाटावरून ट्रक व ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैधरीत्या वाहतूक होऊ नये, यासाठी तपासणी करीत असताना ईटान मार्गावर विरली (बुज) चौकीजवळ एम.एच. ३३/४४८५, एम.एच. ३३/४४९८, एम.एच. ३१/ सी.क्यु. ११२१ हे तीन रेती भरलेले ट्रक थांबवून चौकशी केली असता ट्रक ओव्हरलोड आढळून आले. त्यापैकी एम.एच. ३३/४४९८ या ट्रक चालकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकारलेला दंड भरून पुढचा मार्ग धरला. परंतु एम.एच. ३१/ सी.क्यु. ११२१ या ट्रकचालकाने तीन ब्रास रेतीचा परवाना दाखवून प्रत्यक्षात ट्रकमध्ये ४.५ ब्रास रेती असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. दंडाची रक्कम भरण्यासाठी ट्रकचालकाने विरोध दर्शविल्याचे नायब तहसीलदार मोहोड यांचे म्हणने आहे. महसूल अधिकाऱ्यांसोबत वाद घालून अन्य रेती व्यावसायिकांना फोन केला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस मदत मागविण्यात आली. रात्री ९.३० च्या दरम्यान पोलीस वाहनासह घटनास्थळी आले असता ट्रकचालक रोहणकर यांनी ट्रक सुरू करून पवनीमार्गे निघाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. धामणी शिवारात ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून रोहणकर यांचा जागीच मृत्यू झाला. परंतु रोहणकर यांना महसूल विभागाचे अधिकारी व पोलिसांनी ट्रकमधून ओढल्याचा ट्रकचालक मालक संघटनेने आरोप केला आहे.
याप्रकरणी हगययीने ट्रक चालवून स्वत:चे अपघातास कारणीभूत होऊन मरण पावला, अशी लेखी तक्रार नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात दाखल केली.
या घटनेची माहिती मिळताच सर्व रेती ट्रक चालक-मालकांनी रात्रीच लाखांदूर पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन दोषी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत लाखांदूर पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी भंडारा, पवनी, अड्याळ, दिघोरी, पालांदूर येथून पोलिसांची कुमक बोलाविली. (तालुका प्रतिनिधी)
अपघात की घातपात?
घटनास्थळाच्या निरीक्षणांती याघटनेविषयी गावकऱ्यांमध्ये तर्कवितर्कांना ऊत आला असून हा खरोखरच अपघात की घटनास्थळावर नायब तहसीलदारांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांसोबत ट्रकचालक रोहणकर यांची बाचाबाची होऊन कर्मचाऱ्यांनी काही घातपात केला का? असाही संशय व्यक्त होत आहे.
मृत्यूला जबाबदार कोण?
सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रेतीघाट सुरु असताना रात्रीअपरात्री रेतीची वाहतूक होते कशी? असा प्रश्न विरली येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. रेती व्यवसायातून मोठी कमाई सुरू आहे. परंतु महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यात मागे नाहीत. एक पोलीस अधिकारी रेती प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकलेला लोकांनी पाहिलेला आहे. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने रेती घाटाशी मैत्री जोडून स्वत:ची गुंतवणूक रेतीघाटात केल्याची चर्चा आहे.
३१ जणांना घेतले ताब्यात
ट्रक चालक दिलीप रोहणकर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त ट्रक चालक मालक संघटनेने रास्ता रोको केला. याप्रकरणी ट्रक मालक चालक संघटनेचे नरेंद्र बुरडे, महेंद्र निंबार्ते, श्रीराम पोहरकर, नितीन तिवारी, गजानन ठवरे, संजय गायधने, खेमराज हटवार, आशिष कळंबे, समोहन मेश्राम, अब्दुल शेख, राहुल मरठे, राकेश पाल, विनोद तुळणकर, शिवा गायधने, जारेश्वर टांगले, नंदकिशोर सवारबांधे, फिरोज अंसारी, कयाम खान, महम्मद इनाबुल खान, आशिष सातपुते, शत्रुघ्न कानतोडे, दिपक मानापुरे, सुरेंद्र पोटे, प्रशांत पानसे, शेखर मोहनकर, अशोक नांदुरकर, उमेश हटवार यासह अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे नोंदविले आहेत.
जमावाने जाळला तपासणी नाका
पवनी : पवनी व लाखांदूर तालुक्यातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरु असल्याने तपासणी करण्यासाठी पवनी बस स्थानकाजवळ पोलीस व महसूल विभागाने उभारलेली (राहुटी) तपासणी चौकी ५० ते ६० जणांच्या जमावाने बुधवारला पहाटे जाळली.
पोलीस सूत्रानुसार, इटान घाटावरून वाहतूक करणाऱ्या रेतीच्या ट्रकचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग केला. त्यावेळी विरली गावानजिक चालकाने ट्रकमधून उडी घेऊन पसार होण्याच्या हेतूने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ट्रकखाली चिरडल्यामुळे दिलीप रोहणकर या वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती रेतीघाटाशी संबंधितापर्यंत क्षणात पोहचली.
पाहता पाहता नागपूरपासून लोक पोहचले. मृतदेह पवनी व नंतर भंडारा येथे पाठविण्यात आला. ही सर्व मंडळी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी पवनी बस स्थानकाजवळ उभारलेल्या तंबूच्या चौकीजवळ पोहचले व त्यांनी चौकी जाळून टाकली. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पवनी पोलिसांनी समुहाने येऊन धमक्या देणे, शासकीय कामात अडथळा, जाळपोळ करणे व जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्हे दाखल केले. (तालुका प्रतिनिधी)