मलनिस्सारण योजना राबवून वैनगंगेचे प्रदूषण थांबवा
By Admin | Updated: June 14, 2014 01:41 IST2014-06-14T01:41:31+5:302014-06-14T01:41:31+5:30
नागपूर शहरातील सांडपाणी नागनदीत सोडले जाते. ते दूषित पाणी वैनगंगेत समायोजित होते.

मलनिस्सारण योजना राबवून वैनगंगेचे प्रदूषण थांबवा
भंडारा : नागपूर शहरातील सांडपाणी नागनदीत सोडले जाते. ते दूषित पाणी वैनगंगेत समायोजित होते. तद्वतच भंडारा शहरातील सांडपाणीही वैनगंगा नदीत सोडले जात
असल्याने नदी प्रदूषित होत आहे. त्याचे दुष्परिणाम मनुष्य आणि अन्य प्राणिमात्रावर होऊ लागल्याने वैनगंगेचे प्रदूषण तत्काळ थांबवून आरोग्य दृष्ट्रीने मलनिस्सारण योजना
राबवून वैनगंगेचे प्रदूषण थांबवा, अशी मागणी नगरसेवक हिवराज उके यांनी भंडारा नगरपालिका, नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व शासनाकडे केली आहे.
ज्या ठिकाणचे पाणी मनुष्य किंवा इतर सर्व पशुपक्षी पितात, त्या सर्व ठिकाणी नदी असो की नाले, विहिरी असो की तळे अशा कुठल्याही ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत
नाही. तसेच ते सांडपाणी शहरातील असो की उद्योग-व्यवसायातील रसायनयुक्त पाणी सर्वांसाठी घातक आहे. यासाठी काही नियम व कायदे आहेत. पण त्याची
अंमलबजावणी करणारी व करवून घेणारी यंत्रणा नीट नसेल तर अशा यंत्रणेचा व कायद्याचा उपयोग काय, असा प्रश्नही उके यांनी उपस्थित केला आहे. दूषित पाणी कुठलेही
असो जर नदी नाल्यात किंवा तळ्यात सोडायचा असल्यास शासनाने काही यासाठी प्रकल्प आणि योजना उपलब्ध करून दिल्या आहेत.
मलनिस्सारण योजना आणि या योजनेमुळे घाण पाणी, सांडपाणी आणि एकूणच दूषित पाणी या प्रक्रिया करून त्याला शुद्ध करून इतरत्र सोडले जाते. परंतु या सर्व योजनेचा
लाभ घेण्यासाठी किंवा मिळवून घेण्यासाठी जाणिवा आणि इच्छाशक्ती होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची काळाजी गरज आहे.
मलनिस्सारण योजना कार्यान्वित करायची असेल तर त्यापूर्वी भूमिगत गटार योजना अंमलात आणावी लागेल आणि त्यासाठी त्यापूर्वी पर्याप्त मात्रेत पाणी उपलब्ध करू शकेल
अशी पाण्यासाठी असलेली नगरोत्थान योजना अमलात आणावी लागेल आणि ही नगरोत्थान योजना अमलात आणायची असेल तर त्यापूर्वी सुजल निर्मल योजना अमलात
आणावी लागेल.
या सर्व योजना एक दुसऱ्याशी निगडित असूनही आजच्या घडीला एकही योजना पूर्णपणे अस्तित्वात आली नाही. सध्या सजल निर्मल योजनेचे सर्वेचे काम अंतिम टप्प्यात
असल्याचे सांगितले जाते, परंतु अजूनही त्याला बराच कालावधी लागेल जे फार पूर्वीच व्हायला पाहिजे होते.
तत्कालीन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी पासून आमदार निधी व खासदार निधीचा पैसा नगरपालिकेला देऊन पाण्याची समस्या दूर करण्यात
यावी म्हणून निवेदने दिली. पैसा आणि पाणी तर दूर साधे निवेदन पत्राचे उत्तर देण्याचे सौजन्यसुद्धा दाखविले नाही. वैनगंगा नदीचे पाणी दूषित होत आहे. प्रदूषित होत आहे.
आता नदीत आंघोळीच्या लायकीचे राहिले नाही त्याने आजार बळावू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)