कान्होबाच्या निमित्ताने कुंभार गल्लीत भक्तांची पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:28+5:30
यंदा कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणात गोकूळाष्टमी साजरी होत असून कान्होबाला घरी नेण्यासाठी पालांदूरच्या कुंभार गल्लीत भक्तांची पाऊले वळली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना हक्काचा रोजगारही मिळाला आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल सुरू आहे. मात्र मूर्तीकारांना सध्या बरे दिवस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : श्रावणमास म्हटला की आनंदाला उधाण. याच महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अर्थात कानोबाचा सोहळा गावोगावी आणि घरोघरी साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणात गोकूळाष्टमी साजरी होत असून कान्होबाला घरी नेण्यासाठी पालांदूरच्या कुंभार गल्लीत भक्तांची पाऊले वळली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना हक्काचा रोजगारही मिळाला आहे.
यावर्षी कोरोना संकटामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल सुरू आहे. मात्र मूर्तीकारांना सध्या बरे दिवस आले आहे. गोकुलाष्टमी, गणेशचतुर्थी यामुळे कुंभार गल्लीत चहल पहल वाढली आहे. मंगळवारी साजरा होणाºया कान्होबा सोहळ्यासाठी भक्त आतूर झाले आहेत. पालांदूरच्या कुंभार गल्लीत ओळीने श्रीकृष्णाच्या मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. या गल्लीत २५ ते ३० कुंभारांची घरे असून ही सर्व मंडळी भक्तांची वाट पाहत आहे. अगदी साधेपणाने आणि घरगुती उत्सव असल्याने अनेक जण लहान मूर्ती खरेदीकडे कल दिसत आहे. महिला मूर्तीकार वनिता पातरे म्हणाले, गत आठ दिवसापासून कान्होबा घडविण्याचे काम सुरू आहे. घरातील सर्व सदस्य या कामात व्यस्त आहेत. यावर्षी आम्ही ५० मूर्त्या घडविल्या असून भक्त जो दाम देईल, तो आम्ही स्विकारून असे त्यांनी सांगितले.
आज श्रीकृष्णाची घराघरात होणार प्राणप्रतिष्ठा
करडी (पालोरा) : श्रावण मासात येणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी, करडी परिसरात हा सण मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा केला जातो. हिंदू धर्मियांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचे सणाचे विशेष महत्व आहे. भाविक मोठ्या उत्साहात, भक्तीभावात भगवान कृृष्णाची प्राणप्रतिष्ठा घराघरात करतात. करडी परिसरात या उत्सवाला उधाण असते. मनोभावे पूजन व विविध कार्यक्रमांचे रात्री आयोजन पार पडतात. भगवान कृष्णाला पंचपक्कावानांचा भोग लावला जातो. भाविक भक्तांना सुद्धा पक्कवानांचा, फराळांचा आस्वाद मिळतो. कार्यक्रमात तरूणांचा जोश पाहण्यासारखा असतो. रात्री भजन, किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होतात. रात्री १२ कृष्ण जन्माचे वेळी पूजापाठ करून, नारळ फोडून प्रसादाचे वितरण केले जाते. परंतू सध्या कोरोना संकट असल्याने अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर विरजन पडले आहे.