शहर काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST2021-04-03T04:31:19+5:302021-04-03T04:31:19+5:30
०२ लोक ०१ के मोहाडी : नळ सोडण्याच्या वेळी वीज पुरवठा बंद करावा, सूर नदीत पेंच धरणाचे पाणी सोडण्यासाठी ...

शहर काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
०२ लोक ०१ के
मोहाडी : नळ सोडण्याच्या वेळी वीज पुरवठा बंद करावा, सूर नदीत पेंच धरणाचे पाणी सोडण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, अडकलेला घरकुल निधी त्वरित देण्यात यावा, मोहाडी शहराच्या आतील रस्त्यावरून होणाऱ्या रेतीच्या जड वाहतुकीला आळा घालावा, इत्यादी मागण्यांचे निवेदन शहर काँग्रेस कमिटी, मोहाडीतर्फे नगर पंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
सध्या सूर नदीत पाणी नसल्याने मोहाडी शहराला दोन दिवसाआड नळाचे पाणी सोडण्यात येत आहे. ज्यांच्याकडे टिल्लू पंप आहेत ते अधिकचे पाणी ओढून घेतात. त्यामुळे इतर लोकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा मिळत नाही. त्यामुळे नळ सोडण्याच्या वेळी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला तर सर्वांना सारखे पाणी मिळेल व पाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्यासाठी विद्युत विभागाशी त्वरित संपर्क करून तोडगा काढण्यात यावा, येथील नळ योजनेचे पंप हाऊस सूर नदीवर असून, संपूर्ण नदी आटलेली असल्याने पाणीटंचाई दूर करण्यासाठी पेच धरणाचे पाणी नदीत सोडण्यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न करण्यात यावे, अनेक घरकुल धारकांना केंद्र सरकारकडून मिळणारे दीड लाख रुपये मिळालेले नाहीत. त्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. घरकुलधारकांना उरलेली रक्कम त्वरित देण्यात यावी, तसेच मोहाडी शहरातील आतील रस्त्यावरून रेतीची होणारी अवैध वाहतूक थांबविण्यात यावी, यामुळे शहरातील रस्ते खराब होणार नाहीत. इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या विषयावर चर्चा करण्यात आली असता, राज्य शासनाचे प्रतिघरकुल एक लाख रुपये प्राप्त झाले असून, ते वाटपसुद्धा करण्यात आले आहेत. परंतु केंद्र शासनाकडून मिळणारे एक लाख ५० हजार रुपये अप्राप्त आहेत. त्यासाठी ५ जानेवारी २०२१ ला व नंतर फेब्रुवारीला सुद्धा म्हाडाकडे रितसर निधीची मागणी केली आहे. सूर नदीत पेच धरणाचे पाणी आठ ते दहा दिवसात सोडण्यात येईल. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. सूर नदीवर पाणी अडविण्यासाठी कच्चा बांध तयार झालेला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रामेश्वर पांडागळे यांनी शिष्टमंडळाला दिली तसेच इतर मागण्यासुद्धा प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना काँग्रेस शहर अध्यक्ष हरिराम निमकर, माजी नगराध्यक्ष गीता बोकडे, स्वाती निमजे, माजी उपाध्यक्ष सुनील गिरेपुंजे, राजन सिंगनजुडे, प्रदीप वाडीभस्मे, विजय बोकडे, सिराज शेख, मनोहर बोरघरे, रागिनी सेलोकर, शोभा बुरडे, अनंतराम मेश्राम, मंदा धकाते, वंदना मेश्राम इत्यादी उपस्थित होते.
शासनाकडे घरकुलाच्या उपलब्ध निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केलेले असून, उर्वरित केंद्र शासनाच्या निधीची मागणी केलेली आहे. केंद्र शासनाचा निधी उपलब्ध होताच घरकुलधारकांना उर्वरित निधी वाटप केला जाईल.
रामेश्वर पांडागळे, मुख्याधिकारी,
नगरपंचायत, मोहाडी.