कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:30+5:30

भंडारा जिल्हा सहकारी व्यवस्थापक संजय बुरडे व सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती दिली. सिल्ली व शहापूर येथे २४० सभासद आहेत. कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेला प्रारंभ झाला असून उर्वरीत सभासदांची यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या शहापूर शाखेत उपनिबंधक मनोज देशकर यांनी कर्जमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.

 Start implementation of Debt Relief Scheme | कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ

कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ

ठळक मुद्दे३५ हजार पात्र लाभार्थी : सिल्ली-शहापूर येथे आधार प्रमाणीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस सोमवार पासून जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. सिल्ली व शहापूर येथे प्रायोगीक तत्वावर कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ३५ हजार ३२५ लाभार्थी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सोमवारपासून अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. शहापूर ग्रामपंचायतीच्या सरकार सेवा केंद्रात जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, भंडारा जिल्हा सहकारी व्यवस्थापक संजय बुरडे व सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती दिली. सिल्ली व शहापूर येथे २४० सभासद आहेत. कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेला प्रारंभ झाला असून उर्वरीत सभासदांची यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या शहापूर शाखेत उपनिबंधक मनोज देशकर यांनी कर्जमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात १ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली २ लाखापर्यंत रक्कम आहे. अशांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्याकडील १० हजार ११० व भंडारा जिल्हा सहकारी बँकेने २५ हजार २१५ लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. पात्र शेतकरी सभासदांनी आपले नावे असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.

शेतकरी म्हणतात, कर्जमुक्तीचा आनंद मोठा
शहापूर येथील शेतकरी कमलाबाई रुपचंद हजारे म्हणाल्या, माझ्यावर सोसायटीचे १ लाख ५४ हजार ६७१ रुपये कर्ज होते. शासनाने कर्जमुक्ती दिली आहे. प्रक्रिया सुलभ व जलद होती. कार्यालयात चकरा माराव्या लागल्या नाही. आज आधार प्रमाणिकरण पावती मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, असे त्या म्हणाल्या.

 

Web Title:  Start implementation of Debt Relief Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.