जात पडताळणीचे कार्यालय सुरू करा
By Admin | Updated: June 14, 2014 23:23 IST2014-06-14T23:23:18+5:302014-06-14T23:23:18+5:30
महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्यात जात पडताळणीचे स्वतंत्र कायमस्वरूपी कार्यालय स्थापन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री चरण वाघमारे यांनी केली आहे.

जात पडताळणीचे कार्यालय सुरू करा
शासन सुस्त : नागरिक त्रस्त
भंडारा : महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्यात जात पडताळणीचे स्वतंत्र कायमस्वरूपी कार्यालय स्थापन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री चरण वाघमारे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात विभागीय स्तरावर एकूण १५ विभागीय जात पडताळणी समित्या कार्यरत असून या समित्यांमार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्गातील व्यक्तीच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते.
नागपूर येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयात अर्जदारांनी जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्यास सदर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून देखील कधी अधिकारी तर कधी कर्मचारी नसल्याचा बहाणा तर कधी प्रस्तावात त्रृटी असल्यामुळे प्रस्ताव निकाली काढण्यास वर्षानुवर्षाचा कालावधीत लागत असल्याने भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना शारीरिक व मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शासन सुस्त व नागरिक त्रस्त, असे चित्र सकृतदर्शनी दिसून येत आहे.
सध्या शासनाने शिक्षण, नौकरी, निवडणूक यासारख्या अति महत्वाच्या कामासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक केले असल्यामुळे नागरिकांना या प्रमाणपत्राची नितांत आवश्यकता असते परंतू नागपूर येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयातून जात पडताळणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव विहीत कालावधीत निकाली निघत नसल्यामुळे याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून असंतोष पसरत आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्यात जात पडताळणीचे स्वतंत्र कार्यालय स्थापन केल्यास प्रस्ताव विहीत कालावधीत निकाली निघतील तसेच नागरिकांचा जाण्या येण्याचा त्रास कमी होईल व पैशाचीही बचत होईल.
याबाबत महाराष्ट्र शासनाने याबाबत सहानुभूतीपूर्वक सम्यक विचार करून भंडारा जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात जात पडताळणीचे स्वतंत्र कार्यालय सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री चरण वाघमारे यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)